Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पार्कात मेळावा आम्ही घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच आता या वादामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. न्यायालयामध्ये भेटलेल्या नेत्यांसोबत संजय राऊत यांनी चर्चा करताना दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या विषयाबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, “शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घ्यावा” असा सल्ला दिला आहे.

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकावर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यातील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे भाषण ऐकल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांच्या तोंडून बाहेर पडली, असे भास्कर जाधव म्हणाले होते. आता भास्कर जाधव यांच्या याच वक्तव्यावर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. भास्कर जाधव यांना डॉक्टरांची नितांत गरज आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार केले नाही, तर ते वेडे होऊन दगडही मारू शकतात, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
ncert book latest news
बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
Live Updates

Maharashtra News Updates, 20 September 2022: राज्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची प्रत्येक अपडेट

20:02 (IST) 20 Sep 2022
खळबळजनक : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील नवी पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज(मंगळवार) घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी (सुसाईड नोट) देखील आढळून आली आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:59 (IST) 20 Sep 2022
“२०० आमदार, ३५० खासदार असे सत्तापिपासू भाजपाचे उद्दिष्ट असते, आमचे उद्दिष्ट…” – नाना पटोलेंचे टीकास्त्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पटोलेंनी “२०० आमदार, ३५० खासदार असे सत्तापिपासू भाजपाचे उद्दिष्ट असते. आमचे उद्दिष्ट हे जनतेचे काम आहे.” असं म्हटलं आहे. तर, “विरोधात असताना भाजपावाले महागाई विरोधात बेंबीच्या देठापासून ओरडायचे.” असं म्हणत त्यांनी महागाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:42 (IST) 20 Sep 2022
मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू; महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीची शक्यता

भारतासाठी हक्काचा पाऊस म्हणून ओळख असलेल्या नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी (२० सप्टेंबर) जाहीर केले. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता.

सविस्तर वाचा

18:19 (IST) 20 Sep 2022
अभिनेता अरमान कोहलीला अखेर जामीन; अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक

अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने मंगळवारी अखेर जामीन मंजूर केला. गेले वर्षभर तो कारागृहात आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी मंगळवारी अरमान याची जामिनाची मागणी मंजूर करून एक लाख रुपयांच्या बंधपत्रावर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा

17:36 (IST) 20 Sep 2022
डोंबिवली जवळील वडवली गावात १५ लाखाचा गुटखा जप्त

डोंबिवली जवळील कोळे-वाकळण रस्त्यावरील वडवली गाव हद्दीत एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या ट्रकमधून मानपाडा पोलिसांनी १४ लाख ५८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात ट्रक चालकाला अटक केली आहे. त्याच्या सहकाऱ्याचा मानपाडा पोलीस शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा

17:19 (IST) 20 Sep 2022
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र लवकरच शालेय अभ्यासक्रमात - शिक्षणमंत्री दीपक केसरकर

इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात, विशेषतः बालभारती तसेच युवक भारतीच्या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र शिकवण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षणमंत्री केसरकर यांनी तत्काळ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (एस.सी.ई.आर.टी.) या संस्थेच्या संचालकाला बाबासाहेबांचे जीवनचरित्र अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

सविस्तर वाचा

16:44 (IST) 20 Sep 2022
टीईटी प्रकरणात वेतन बंद केलेल्या याचिकाकर्त्यां शिक्षकांना दिलासा; खंडपीठाने दिला असा निर्णय…

टीईटी प्रकरणात वेतन बंद केलेल्या शिक्षकांना औरंगाबाद खंडपीठात अंतरिम दिलासा मिळाला आहे. पुढील आदेशापर्यंत कार्यवाही न करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणात सुमारे एक हजारपेक्षा अधिक शिक्षकांच्या दीडशेंवर याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. नागपूर खंडपीठ व मुंबई उच्च न्यायालयातही या प्रकरणी याचिका दाखल आहेत.

सविस्तर वाचा

16:41 (IST) 20 Sep 2022
“ठाकरे सेनेचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या विचारांचा…” गुलाबराव पाटलांची टीका

ठाकरे सेनेचा दसरा मेळावा म्हणजे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या विचारांचे मिश्रण असेल. मात्र, आमचा मेळावा हा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र मेळावा असेल, असे वक्तव्य पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत.

सविस्तर वाचा

15:57 (IST) 20 Sep 2022
करोनानंतर मुंबई विमानतळावर सर्वाधिक प्रवाशांची नोंद; जाणून घ्या किती प्रवाशांनी केला प्रवास…

करोना संसर्ग नियंत्रणात येताच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून मुंबई विमानतळावर एकाच दिवसांत येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या तब्बल एक लाख ३० हजार ३७४ प्रवाशांची नोंद झाली आहे. ही नोंद १७ सप्टेंबर २०२२ रोजी झाली. करोनाकाळानंतर आतापर्यंतची मुंबई विमानतळावरील ही सर्वाधिक प्रवासी संख्या असल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली.

सविस्तर वाचा

15:43 (IST) 20 Sep 2022
ठाणे : जिल्ह्यात तीन आठवड्यात १६ करोना मृत्यू; रुग्णसंख्या घटली मृत्यू वाढले

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या जरी घटत असली तरी मृत्यूंमध्ये मात्र काही अंशी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील वीस दिवसांच्या कालावधीत करोनामुळे १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेले सर्व नागरिक हे सुमारे ६० वयोगटातील असून त्यांना सह्व्याधी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

15:36 (IST) 20 Sep 2022
चंद्रपूर : राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर महिलांची निदर्शने; मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप

मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त महिलांनी मनसे नेते राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर निदर्शने केली. कलकाम नावाच्या खासगी कंपनीत पैसे गुंतवणाऱ्यांची १०० कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे. या फसवणूक प्रकरणी कंपनी संचालक तथा स्थानिक अधिकारी, अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वाचा

15:08 (IST) 20 Sep 2022
केवळ लेखन प्रतिसादातून साकारली ‘मिस्टेड ट्रेल्स’; डॉ. अजय जोशी, दिलशान बोआंगे यांची इंडो-श्रीलंकन दीर्घकथा

दोन लेखकांनी मिळून केलेल्या साहित्य निर्मितीची उदाहरणे आहेत. पण नाट्य समीक्षक डॉ. अजय जोशी आणि श्रीलंकेतील लेखक दिनशान बोआंगे यांनी एकमेकांशी काहीही चर्चा न करता, केवळ एकमेकांना लेखनातून प्रतिसाद देत ‘मिस्टेड ट्रेल्स’ ही दीर्घकथा साकारली आहे. या अनोख्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (२५ सप्टेंबर) करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

14:53 (IST) 20 Sep 2022
प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; तरुणाला वसतिगृहात डांबून मारहाण करणारे तिघे अटकेत

प्रेमसंबंधाच्या संशयातून चौघांनी तरुणाचे  राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणाला आंबेगाव परिसरातील एका वसतिगृहात डांबून मारहाण केली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 20 Sep 2022
साधना बहुळकर यांना कृष्ण मुकुंद पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांनी लिहिलेल्या ‘बॉम्बे स्कूल’ परंपरेतील स्त्री चित्रकार’ या पुस्तकास नलिनी गुजराथी पुरस्कृत कृष्ण मुकुंद उजळंबकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

सविस्तर वाचा

14:34 (IST) 20 Sep 2022
‘भारत विद्या’ ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे उद्या निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण

प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यास आणि संशोधनाला जागतिक स्तरावर नेण्याच्या उद्देशातून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे निर्मिती करण्यात आलेल्या ‘भारत विद्या’ या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे (डिजिटल प्लॅटफाॅर्म) बुधवारी (२१ सप्टेंबर) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानासह पारंपरिक ज्ञानसाठा खुला करत भांडारकर संस्थेने प्राच्यविद्या अभ्यासाला आधुनिक माध्यमाचा साज दिला आहे.

सविस्तर वाचा

14:16 (IST) 20 Sep 2022
जलस्त्रोत काठोकाठ; बारवी, आंध्रा धरण भरले, जिल्ह्याची पाणीचिंता मिटली

गेल्या पंधरा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणे काठोकाठ भरले आहेत. जिल्ह्यातील विविध शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्याच्या घडीला ९७ टक्के इतका पाणीसाठा आहे. तर पुण्यातील ज्या धरणातून उल्हास नदीत पाणी सोडले जाते ते आंध्रा धरणही ९७ टक्के भरले आहे.

सविस्तर वाचा

14:15 (IST) 20 Sep 2022
'ते' दोघेही चर्चांमध्ये फारसा वेळ घालवत नाहीत, म्हणूनच तर... - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज(मंगळवार) मतदारसंघातील प्रश्नांबाबत पुण्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा सध्या सुरू असलेला वाद आणि त्यावर सुरू असलेले राजकारणावर देखील प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी..

14:13 (IST) 20 Sep 2022
बँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषेचा ‘सर्वोच्च कीर्ती’ पुरस्कार प्रदान

पुणे : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे राजभाषा वापरासाठी देण्यात येणारा सर्वोच्च कीर्ती पुरस्कार देशाच्या बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्रला प्रदान करण्यात आला. बातमी वाचा सविस्तर ....

13:21 (IST) 20 Sep 2022
विरोधक तर असला पाहिजे आणि तोही दिलदार ; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मतदार संघातील प्रश्ना बाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता त्यावेळी त्यांना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दसरा मेळाव्यावरून वाद सुरू झाला आहे. बातमी वाचा सविस्तर ...

12:47 (IST) 20 Sep 2022
स्मार्ट सिटीमधील खड्ड्यांविरुद्ध मनसेने केले असे काही कि…

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हटले जाते . मुख्य रस्ते चकाचक असले तरी काही ठिकाणी मात्र खड्डे बुजवण्यासाठी स्थानिक नेत्यांना आंदोलन करावं लागत आहे. मनसेच्या महिला शहर उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांनी चक्क पितृपक्ष असल्याने खड्ड्यांच श्राद्ध घालत खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. काळेवाडीच्या काही भागात रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. बातमी वाचा सविस्तर ...

12:39 (IST) 20 Sep 2022
रुपीचा बँकेच्या दोषी संचालकांवर कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका

पुणे : रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द होऊ नये, बँकेवर नवीन प्रशासक मंडळ नेमून दोषी संचालक आणि अधिकाऱ्यांवर दिवाणी आणि फौजदारी कारवाई करावी, यासाठी रुपी बँकेच्या कर्मचारी संघटना आणि रुपी संघर्ष समिती यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. बातमी वाचा सविस्तर ...

12:13 (IST) 20 Sep 2022
विरोधक दिलदार असला पाहिजे, नाहीतर राजकारण… – सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा!

भाजपाकडून उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेऊ ने देण्यासाठी आणि एकनाथ शिंदें गटाचा मेळावा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी...

11:44 (IST) 20 Sep 2022
एआरएआय’ तर्फे पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची ‘उत्सर्जन यादी’ प्रसिद्ध

पुण्यातील ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ( एआरएआय) या संस्थेतर्फे जिल्ह्यातील हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारी प्रदूषके आणि त्यांचे स्रोत यांचा समावेश असलेली उत्सर्जन यादी (एमिशन इनव्हेनटरी) तयार करण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर ...

11:26 (IST) 20 Sep 2022
डोंबिवली पूर्व सुदामवाडीतील रहिवासी कचऱ्याच्या ढिगांनी हैराण

डोंबिवली : डोंबिवली पूर्वतील नेरुरकर रस्त्यावरील सुदामवाडी प्रवेशव्दाराच्या कोपऱ्यावर पादचारी दररोज कचरा टाकत असल्याने सुदामवाडी परिसरातील रहिवासी हैराण आहेत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने पावसामुळे कुजून तो परिसरात दुर्गंधी पसरते. बातमी वाचा सविस्तर ...

10:59 (IST) 20 Sep 2022
नवी मुंबई : रस्त्यावरील वाहनांच्या प्रकाशानंतर होतोय पथदिव्यांचा झगमगाट….

नवी मुंबई शहरात पामबीच मार्ग , ठाणे बेलापूर मार्ग, एमआयडीसीमधील रस्ते व सायन पनवेल महामार्ग अशा अनेक मार्गावर दिवाबत्तीसाठी हजारो दिवे लावण्यात आले आहेत.परंतू जवळजवळ सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात पथदिवे डोळे मिचकावतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत .त्यामुळे रस्त्यावर लवकर काळोख पडत असल्यानेपथदिवेही लवकरात लवकर लावण्याची गरज आहे. बातमी वाचा सविस्तर ...

10:46 (IST) 20 Sep 2022
सुधारगृहातून पलायन केलेल्या मुलीची रवानगी पुन्हा बालसुधारगृहात

नवी मुंबई : सुधारगृहात रवानगी केलेल्या एका मुलीने तेथून पलायन केले होते. सदर मुलगी घणसोली येथील चिंचआळीत आढळून आल्यावर तिला काही लोकांनी ओळखले. ही बाब काही स्थानिक पुढाऱ्यांला कळल्यावर त्यांनी सदर मुलीस रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले.घणसोली येथील चिंचआळीत एका अल्पवयीन मुलीचे अन्य काहींशी वाद सुरू होते. बातमी वाचा सविस्तर ...

10:39 (IST) 20 Sep 2022
शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यामुळे मारहाण करून युवकाचा प्रेयसीवर बलात्कार

नागपूर : शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीला मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने पोलिसात प्रियकराने बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली असून त्याने बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. बातमी वाचा सविस्तर ...

10:11 (IST) 20 Sep 2022
पुण्याच्या काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

पुणे : विद्युत, स्थापत्य विषयक कामांमुळे पर्वती जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी (२२ सप्टेंबर) बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली. बातमी वाचा सविस्तर ...

10:05 (IST) 20 Sep 2022
पुरंदर विमानतळाबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे विभागीय आयुक्तांचे एमएडीसी, जिल्हा प्रशासनाला आदेश

पुणे : पुरंदर येथील पुण्याच्या हक्काच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूसंपादन कायद्यानुसार करण्याचे निश्चित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेंट कंपनी – एमएडीसी) आणि जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्रकल्पाबाबत आतापर्यंत केलेल्या सर्व कार्यवाहीचा कागदोपत्री अहवाल एमआयडीसीकडे सुपूर्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. बातमी वाचा सविस्तर ...

09:50 (IST) 20 Sep 2022
“पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडी-सीबीआयचा गैरवापर करत नाहीत, तर…,” ममता बॅनर्जींचं मोठं विधान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि ईडीच्या गैरवापरामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असावेत असं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. हे काही भाजपा नेत्यांचं काम आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या भूमिकेविरोधात तृणमूल पक्षाने विधानसभेत ठराव मंजूर केला. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी हे विधान केलं.

सविस्तर बातमी

09:49 (IST) 20 Sep 2022
वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने(एमआयडीसी) केलेल्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली आहे. उद्योग विभागाने केलेल्या छाननीअंती १८१ भूखंड वाटपावरील स्थगिती उठविण्यात आली. दरम्यान, १० प्रकल्पांची छाननी अद्यापही सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सविस्तर बातमी

09:37 (IST) 20 Sep 2022
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर गुलाबराव पाटलांचे विधान, म्हणाले...

शिवसेना पक्षातर्फे शिवजी पार्कवर दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक अशा दोन्ही बाजूने शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी दोन्ही गटाने महापालिकेकडे अर्ज केलेला आहे. असे असताना शिंदे गटातील नेते तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मैदान तसेच कोणत्याही पार्कवर कोणाची मालकी नसते. ही सर्वजनिक मालमत्ता आहे. महापालिका ज्यांना परवानगी देईल, तोच गट शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

सविस्तर वाचा -

Shinde-NCP

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असं भाकित व्यक्त केलं आहे. इतकच नाही तर भाजपामुळेच हे सरकार कोसळेल असंही पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही हे सरकार फार दिवस टिकणार नाही याचा अंदाज असल्याचं विधान त्यांनी केलंय.