Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पार्कात मेळावा आम्ही घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच आता या वादामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. न्यायालयामध्ये भेटलेल्या नेत्यांसोबत संजय राऊत यांनी चर्चा करताना दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या विषयाबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, “शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घ्यावा” असा सल्ला दिला आहे. शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकावर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यातील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे भाषण ऐकल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांच्या तोंडून बाहेर पडली, असे भास्कर जाधव म्हणाले होते. आता भास्कर जाधव यांच्या याच वक्तव्यावर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. भास्कर जाधव यांना डॉक्टरांची नितांत गरज आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार केले नाही, तर ते वेडे होऊन दगडही मारू शकतात, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.