Maharashtra Political Update Today :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात पण ते कधीही जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसंच महापालिकांच्या निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतं आहे? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. दुसरीकडे राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली ती अजून समोर आलेली नाही. राहुल गांधी जे अमेरिकेत बोलले त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे. राज्यातले नेते राहुल गांधींवर टीका करु शकतात. तसंच काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासह महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडी जाणून घ्या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून




Mumbai Maharashtra News Today| महापालिका निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतंय? संजय राऊत यांचा सवाल आणि इतर घडामोडी
ठाणे: बारवी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच दुरुस्ती कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्या, शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे: भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मक्तेदारी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बरोबरच ठाणे जिल्ह्यातही मागील काही वर्षांपासून भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन होत आहे. यावर्षीही जिल्ह्यात भाजी पिकांचे चांगले उत्पादन झाल्याने जिल्ह्यातून सुमारे ४६६ मेट्रिक टन भाजीपाल्याची परदेशात निर्यात करण्यात आली आहे.
बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील सुमारे एक कोटी नागरिकांची तहाण भागवणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदुषणात दिवसेंदिवस भर पडत असून परिणामी उल्हास नदीवर पुन्हा जलपर्णीचा चादर पहायला मिळते आहे.
किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा महामार्ग आणि वाकण खोपोली मार्गावरील अवजड वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
नंदुरबार: नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात बुधवारी बाजारपेठेत पेटत्या ट्रँक्टरचा थरार अनुभवयास मिळाला. चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला.
उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाळकर यांनी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नॅक मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची विद्यापीठ संलग्नता रद्द करण्याचे आदेश विद्यापीठांच्या कुलसचिवांना परिपत्रकाद्वारे दिले.
पुणे : तहसीलदारांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी संचेती पुलावर आंदोलन करणाऱ्या तरुणाविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणे, अधिकाऱ्याला धमकाविणे आदी कलमाअंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजाविण्यात आली आहे.
नाशिक: जळगाव, मनमाड – भुसावळ विभाग रेल्वे पोलीस, सुरक्षा दल आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त कारवाईमुळे दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून होणारी ५९ बालकांची तस्करी रोखण्यात यश आले आहे.
नवी मुंबई : एमआयडीसी वसविताना शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून या जमिनीच्या मोबदल्यात संबंधित भूधारकांना प्रकल्पग्रस्त सदराखाली भूखंड देण्यात आले होते. मात्र भूखंडांसमोरील रस्ता रुंदीचे शुल्क एमआयडीसी आकारात होती. पंरतु आता हे शुल्क लागू न करण्याचा निर्णय एमआयडीसीकडून घेण्यात आलेला आहे.
मुंबईत मे महिन्यात ९,६६१ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रुपात ८२० कोटी रुपये महसूल मिळाला आहे. एप्रिलमध्ये साडेदहा हजारांहून अधिक घरांची विक्री झाली होती. मेमध्ये घर विक्रीत काहीशी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारीत स्वतंत्र पदव्युत्तर (एम.ए) अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.
राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्याबाबत आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या होत्या. मात्र आता त्या बाबतचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक समाज कल्याण अधिकारी गट- अ व ब या पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये समाजकार्याच्या पदवीधारकांनाच डावलण्यात आले होते. याला राज्यभरातील विद्यार्थी आणि संघटनांच्या विरोधातनंतर ‘एमपीएससी’ने शुद्धीपत्रक जाहीर करत गट-अ साठी आता केवळ समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार आहे.
अंबरनाथ: अंबरनाथच्या अतिरिक्त अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीत आता डायलेसिस केंद्र सुरू होणार आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विजय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हे केंद्र सुरू केले जाणार असून शनिवार, ३ जूनला याचे लोकार्पण होईल.
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बाब असून चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोन अंतर्गत बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या विरा नामक वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे.
वाशीम : कुशल व रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात येत आहे. आज ३१ मे रोजी शहरातील राज्यस्थान आर्य कॉलेज येथे आयोजित केलेल्या शिबिराला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी पाठ फिरवली. त्यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी फिरकलेच नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
नागपूर : बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केली. वस्तीत बदनामी झाल्यामुळे युवतीच्या भावाने तिच्या प्रियकराचा लाकडी दांडा आणि दगडाने ठेचून खून केला.
नागपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची सट्टेबाजी खेळणाऱ्या क्रिकेट बुकीला सोनेगाव पोलिसांनी विमानतळाजवळ सापळा रचून अटक केली. कुणाल सचदेव असे नाव असून त्याचे विदेशातील मोठमोठ्या क्रिकेट बुकींसोबत व्यावसायिक संबंध आहेत.
नागपूर : मान्सूनचा भारतातील प्रवेश अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे: कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विराेधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे मेथामाफेटामीन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चारजणांना जेरबंद करण्यात आले आहे.
गोंदिया : छत्तीसगड राज्यातील भिलाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामूल येथील एका गायीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला गोंदिया आरपीएफने मंगळवार, ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर आलेल्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून अटक केली. दरम्यान, आरोपीला आज, बुधवारी भिलाई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
भंडारा : सध्या अन्नपाण्याच्या शोधात माकडांच्या टोळ्या गावात आणि शहराकडे स्थलांतर करीत आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी गावात किंवा शहरी वस्तीत जाऊन माकडांच्या टोळ्या धुमाकूळ घालतात. मात्र, भंडाऱ्यात एक असे माकड आहे जे कुणाच्या घरी जात नाही तर थेट हॉटेलमध्ये जाऊन, टेबलवर बसून शांतपणे त्याच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारते. तहान भूक भागली की शांतपणे निघूनही जाते.
उद्धव ठाकरेंचा गट अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. याची घोषणा उद्धव ठाकरे १९ जून रोजी करणार आहेत. हे खरं आहे की खोटं? संजय राऊतांनी सांगावं. १९ जूनला उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. उद्धव ठाकरे शिवसेना गट या स्थापनेची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे. कारण त्यादिवशी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि पक्षचिन्ह मशाल मिळालं आहे. १९ जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये होणारा उद्धव ठाकरेंचा मेळावा हा अनधिकृत आणि नियमबाह्य आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
भंडारा: दृश्यम चित्रपटात ज्याप्रमाणे हत्या करणारा कोण हे पोलिसांना कळते, त्याला ताब्यात घेवून कसून चौकशीही केली जाते, हत्या करणाऱ्याने प्रेत कुठे पुरले हे ही कळते मात्र शेवट पर्यंत पोलिसांना मृतदेहाचा शोध घेता येत नाही .
अकोले : भूमिपूजनानंतर तब्बल ३१ वर्षांनी निळवंडे धरणाच्या कालव्यात प्रथमच चाचणीसाठी पाणी सोडण्यात आले. प्रस्थापितांचे राजकारण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, बांधकामासाठी वेळोवेळी केली गेलेली अपुरी आर्थिक तरतूद, प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांसाठी अनेकवेळा बंद पाडलेले काम, राजकारणी, ठेकेदार, अधिकारी यांचे हितसंबंध त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले. अद्यापि प्रकल्पाचे नष्टचर्य पूर्णपणे संपलेले नाही.
भंडारा: सध्या स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्याच्या मुसक्या आवळत धाडसत्र सुरू केले आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आणखी एका बुकीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून हितेश प्रकाश हरधनिया ( ३३) रा. शास्त्रीनगर, भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
उरण : उलवे नोडमधील सेक्टर १० (बी) मधील पोलीस चौकीवर बुधवारी रात्री १२ साडेबारा वाजता एका इसमाने डंपरची जोरदार धडक देत नासधूस केली आहे. तसेच चौकीत उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनासह व येथील खाजगी वाहनांचीही नासधूस केली आहे.
येत्या आठ दिवसाच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे पूर्ण करा. खराब रस्ते सुस्थितीत करा, असे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी मान्सुनपूर्व आढावा बैठकीत दिले.
नागपूर: तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने जळगाव ते मनमाड दरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे आणि यार्ड रिमॉडलिंग कामे सुरू आहे त. त्यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान दररोज धावणारी गाडी बुधवारी रद्द करण्यात आली आहेत.
शिंदे फडणवीस सरकाराने कुठलाही अध्यादेश काढला तर त्याचा परिणाम होणार नाही, भाजपा हा शेतकऱ्यांमधून संपलेला पक्ष झाला आहे, त्यांना जिंकण्यासाठी होणार नाही असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली आहे.
वर्धा : मानव प्राण्यांप्रमाणेच पशूंनाही उन्हाची काहिली त्रस्त करू लागली आहे. उष्माघाताचा फटका प्राण्यांनाही बसण्याच्या पशुपालक शेतकरी तक्रारी करीत आहे. त्यासाठी पशुपालन विभाग तयारीला लागला आहे. सर्वाधिक काळजी म्हशींची घेणे आवश्यक ठरत आहे. कारण एकच, म्हशींना असणाऱ्या घामग्रंथी पुरेशा प्रमाणात सक्रिय नसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही.
डोंबिवली – येथील पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर दोन फेरीवाल्यांनी एका पादचाऱ्याला लाथाबुक्की, बांबूने काल रात्री बेदम मारहाण केली. पूर्व भागातील फेरीवाले रस्ते, पदपथांवरून हटत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. जितलाल रामआश्रय वर्मा (२३), श्रीपाल रामआश्रय वर्मा (२५) अशी आरोपी फेरीवाल्यांची नावे आहेत. ते दोघे भाऊ आहेत.
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या १० प्राथमिक शाळा कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत म्हणून मंगळवारी घोषित केल्या.
पिंपरी: अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.
नागपूर : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असताना काँग्रेसचे विदर्भातील नेते मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध मोर्चेबांधणीत व्यस्त आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे यांनी पटोले यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी नुकतीच दिल्लीवारी केली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्रातले खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीत मंगळवारी पहाटे निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बाळू धानोरकर यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
नाशिक: इगतपुरी प्रकरणात मुलीचे प्रियकरासोबत पलायन सहन न झाल्याने आई- वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मध्यरात्री मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपाने मनसेला खिंडार पाडत या पक्षाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला.
वादग्रस्त मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत बंडगार्डन येथील ३०० मीटर लांबीच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत पदपथ, घाट आणि घाटांच्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा…
अमरावती : स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. तथापि, जिल्ह्याचे वैभव असलेली ही विहीर अजूनही दुर्लक्षितच आहे.
आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एकास अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोतया उपस्थित होता. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली . सविस्तर वाचा…
कात्रज-कोंढवा रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी भूसंपादन करावे लागणार असून त्यासाठी जागा मालकांची यादी महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेले २०० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्यानंतर ऑक्टोबरपासून भूसंपादनाची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे.
गडचिरोली : पाच महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा धरणग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार मोबदला देणार, असे जाहीर केले होते. परंतु अद्याप कोणताही मोबदला न मिळाल्याने पीडित शेतकरी मागील ३४ दिवसांपासून पुन्हा साखळी उपोषणाला बसले आहे.
सांगली : लोकसभा, विधानसभा या निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपले महत्त्व वाढावे यासाठी भाजपमधील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.
नागपूर : राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदवी व पदव्युतर पदवी महाविद्यालयांत तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्राध्यापकांची १०५ पदे निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे आता अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील पदभरतीला गती येणार आहे. यामुळे हजारो इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
नागपूर : राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, खर्रासह तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध आहे. त्यानंतरही नागपूरसह मध्य भारतात उच्चभ्रू घरातील तरुणींमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याचे निरीक्षण इंडियन डेंटल असोसिएशनने नोंदवले आहे. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.
अलिबाग- किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून दरम्यान ३५० वा शिवाराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. शिवभक्तांनी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केले. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतंय? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती दिवस मन की बात करत राहणार? कधीतरी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं द्या असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
नागपूर : कोराडीत प्रस्तावित वीज प्रकल्पाच्या जनसुनावणीत काँग्रेस-भाजपा समर्थक समोरासमोर आल्यावर गोंधळ उडाला. सुनावणीत कुणीही विरोधात मत मांडताच उपस्थित जमाव दबावतंत्राचा वापर करत होता. त्यामुळे प्रकल्पाला समर्थन दर्शवणारे खरच स्थानिक नागरिक होते की भाजपा कार्यकर्ते होते, हा प्रश्न आता चर्चिला जात होता.
पिंपरी- चिंचवडमध्ये पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. दिलीप प्रेमनारायण तिवारी, चंदनकुमार राय आणि सुगन कुमार राय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सविस्तर वाचा
(फोटो-इंडियन एक्स्प्रेस/नरेंद्र वसकर)
महाराष्ट्रातल्या राजकीय आणि इतर घडामोडींवर एक नजर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.