Maharashtra News Updates Today : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने भाजपाने तीन जागा जिंकल्या असून महाविकास आघाडाचा एक उमेदवार पराभूत झाला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यामुळे आजदेखील राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तर या विजयामुळे भाजपाला स्फूरण चढले असून विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आम्ही अशीच कमाल करुन दाखवू असा विश्वास भाजपा नेते व्यक्त करत आहेत. राष्ट्रीय पातळीवरही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु असून प्रादेशिक पक्षांना महत्त्व आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीच्या तयारीसाठी येत्या १५ जून रोजी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली आहे. ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपाशाशित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षांना पत्रे लिहून या बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूकदेखील चुरशीची होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये मोसमी पावसाचे आगमन झाले असून मान्सूनने मुंबईसोबतच, ठाणे, उपनगरे आणि पुण्यापर्यंतचा काही भाग व्यापला आहे. कोकणातही मान्सून दाखल झाला असून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. मराठवाड्यातही सध्या काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून आज मान्सूनची आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे.