Maharashtra News Updates, 24 May : हिंदमाता परिसरात पाणी साचू नये म्हणून पालिकेने झेविअर्स मैदानात बांधलेल्या भूमिगत टाक्यांचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे यंदा पावसाळ्यात या परिसरातला पाणी साचण्यापासून मुक्ती मिळणार का हे समजू शकणार आहे. पालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पाची यंदाच्या पावसाळ्यात कसोटी लागणार आहे. तर दावोस आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांतील २३ कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. त्यात आयटी क्षेत्रात आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ३२०० कोटींच्या गुंतवणूक कराराचा समावेश आहे. ही कंपनी पुण्यात विदा केंद्र उभारणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार हे पाणी विरोधी सरकार आहे. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड गुंडाळली, कोकणातून मराठवाड्याला पाणी देणाऱ्या योजनेचा शासन निर्णय रद्द केला. औरंगाबादसारख्या शहरला पाणी देता आलेले नाही, त्यामुळे हे सरकार पाणी विरोधी सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. औरंगाबाद येथे जलआक्रोश मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले. या वेळी बोलताना त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केले. केवळ मुंबई व उपनगरीय भागा पलीकडे त्यांना महाराष्ट्र माहीत नसल्याचेही ते म्हणाले. अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.