राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीवाजा इशारा दिल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणे कठिण होईल असं वक्तव्य नारायण राणेंनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केलं होतं. या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी आक्षेप घेतलाय.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवार आणि शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्यं; म्हणाले, “अजित पवारांना…”

महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता. पवार यांनी विधानसभेत बहुमत चाचणीला उपस्थित राहून दाखवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याला राणेंनी धमकी असं म्हणत या वयामध्ये मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही असा टोला लागवला.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : निलेश राणेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “५० वर्षांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी…”

पवार यांच्या विधानामुळे आता सत्तेचा लढा विधानसभेतच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आघाडीचे नेते संघर्षांच्या भूमिकेत असल्याचे सूचित केले. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी पवारांना लक्ष्य केलं. “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” असं ट्विट राणेंनी केलं.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “…तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा”, शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र; कारण वाचून वाटेल आश्चर्य

राणेंच्या याच वक्तव्यावर संजय राऊतांनी आक्षेप घेत फेसबुकवरुन एक पोस्ट केली असून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाला टॅग केलं आहे. “महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू. अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही,” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

राणेंनी शिवसेनेलाही लक्ष्य केलं
पवारांवर टीका करण्याबरोबरच गुरुवारी रात्री नारायण राणेंनी अन्य दोन ट्विट करत शिवसेनेलाही लक्ष्य केलं. “आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा,” असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

पवार नेमकं काय म्हणाले?
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे खासदार, आमदार, तसेच मंत्री व वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, ‘‘सरकारकडे बहुमत आहे की नाही, ते सभागृहात सिद्ध होईल. शिवसेनेचे जे आमदार बाहेर गेले आहेत, ते परत आल्यानंतर ते शिवसेनेबरोबर राहतील.  विधानसभेत आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध होईल.’’