Maharashtra Assembly Floor Test updates :महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे. गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

Live Updates

Maharashtra Floor Test : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारनं पहिला विजय मिळवला आहे. Read in English

 

13:56 (IST) 4 Jul 2022
आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे – गुलाबराव पाटील

मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केलं. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असं वाटलंही नव्हतं. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. बाळासाहेबांकडे पाहून आम्ही संघटनेत आलो. लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता हे साधन समजून काम करावं लागेल असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. आमच्यावर अनेकांनी बंड केल्याची टीका होत आहे. आम्हाला जे मिळालं आहे बाळासाहेबांमुळे मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी करुन दिली.

13:48 (IST) 4 Jul 2022
आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत – अशोक चव्हाण

बहुमत चाचणीला आम्ही नसल्याचा वेगळा अर्थ काढू नका. उशिरा पोहोचल्याने आम्ही मतदान करु शकलो नाही. मी येईपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद झाले होते. आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

13:43 (IST) 4 Jul 2022
मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता – आदित्य ठाकरे

ज्यांनी व्हिपचं उल्लंघन केलंय त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना कधीच संपणार नाही असंही त्यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलं होतं असा खुलासाही त्यांनी केला. मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

13:41 (IST) 4 Jul 2022
“पाण्याशिवाय मासा तसं सत्तेशिवाय तुमची अवस्था”

यांना भगव्याचा अर्थच माहिती नाही आणि तुम्हाला भाजपाला सत्तेची हाव असल्याचं म्हणता. फडणवीसांनी नेत्यांनी कसं वागावं याचा आदर्श ठेवला आहे. पाण्याशिवाय मासा तसं सत्तेशिवाय तुमची अवस्था झाली आहे अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

13:35 (IST) 4 Jul 2022
“मंत्रालयात पैसे छापण्याचा कारखाना सुरु झाला होता”

अडीच वर्षात खरंच काम केलं का? लोकांच्या प्रमोशनच्या फाईल पडून राहिल्या. मंत्रालयात पैसे छापण्याचा कारखाना सुरु झाला होता असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

13:34 (IST) 4 Jul 2022
“एकनाथ शिंदेंमध्ये पात्रता होती, तर मग तुमच्या टर्ममध्ये त्यांना एकच छोटंस खातं का दिलं होतं?”

राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, “शिंदेंमध्ये पात्रता होती तर मग तुमच्या काळात त्यांना एकच छोटसं खातं का दिलं होतं?” असा सवाल केला. वाचा सविस्तर बातमी…

13:33 (IST) 4 Jul 2022
बाळासाहेबांचं वचन कोणी मोडलं हे माहिती आहे – मुनगंटीवार

बाळासाहेबांचं वचन कोणी मोडलं हे माहिती आहे. अयोध्येच्या राम मंदिरात आमचं योगदान आहे सांगता आणि जे त्याला काल्पनिक समजता त्यांच्याकडे जाता अशा शब्दात मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली.

13:29 (IST) 4 Jul 2022
तुम्हाला भाजपा समजलेलीच नाही – मुनगंटीवार

एक दिवस तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही का? फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही आग लावण्याचं काम करत आहात. तुम्हाला भाजपा समजलेलीच नाही. ज्यांना काही समजलेलं नाही त्यांच्या दु:ख भिंती ऐकत होत्या. सगळं आपल्याच कुटुंबात नेत आहेत. असेल हिंमत तर सांगा कुटुंबातील व्यक्तीला नाही देणार. कार्यकर्त्यांनी फक्त झेंडेच मिरवायचे का? अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केला.

13:26 (IST) 4 Jul 2022
अजित पवार यांचंही अभिनंदन केलं पाहिजे – मुनगंटीवार

अभिनंदन प्रस्तावात दुख आणि सत्ता गेल्याची वेदना दिसत आहेत. अजित पवार यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली आहे. जसे तुम्ही २३ नोव्हेंबरला इकडे येऊन उपमुख्यमंत्री झाले तसंच आता झालं. कधीतरी अशी उडी मारावी लागते असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

13:22 (IST) 4 Jul 2022
एकनाथ शिंदे माघार घ्या, भास्कर जाधव यांचं आवाहन

एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल असंही भास्कर जाधव म्हणाले.

13:20 (IST) 4 Jul 2022
मराठी माणसांवर ईडी चौकशी लावण्यात आली – भास्कर जाधवांचा आरोप

अविनाश भोसले, संजय राऊत, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव या सर्व मराठी माणसांवर ईडी चौकशी लावण्यात आली असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. भास्कर जाधव यांनी यावेळी प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रशांत परिचारक, कपिल पाटील, विजय गावित, सम्राट महाडिक, माणिकराव गावित, सुर्यकांता पाटील अशी अनेक नावं घेतली असता अध्यक्षांनी त्यांना रोखलं.

13:16 (IST) 4 Jul 2022
प्रताप सरनाईक यांचा भास्कर जाधव यांना टोला

भास्कर जाधव यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे हे आज मला समजलं. जी भावना त्यांनी आज व्यक्ती केली ती दीड वर्षांपूर्वी व्यक्त केली असती तर बरं वाटलं असतं. असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावला. भास्कर जाधव यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी नेत्यांचा गोंधळ सुरु झाला आहे.

13:14 (IST) 4 Jul 2022
संजय राठोड यांचं काय करणार आहात? भास्कर जाधव यांची विचारणा

संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं. संजय राठोड यांचं काय करणार आहात? यामिनी जाधव यांची चौकशी लावली, आज त्यांनाचा सुरक्षा दिली जात आहे असंही भास्कर जाधव म्हणाले.

13:13 (IST) 4 Jul 2022
पानिपतच्या लढाईत जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार आहे – भास्कर जाधव

पानिपतच्या लढाईत जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रात युद्ध सुरु आहे. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, भोंगा दिला, नुपूर शर्मा, कंगना आणलीत. पण सत्ता उलटली नाही असं भास्कर जाधव यांनी सुनावलं.

13:10 (IST) 4 Jul 2022
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत, रामायणाची पुनरावृत्ती होणार – भास्कर जाधव

आज महाराष्ट्रात काय सुरु आहे? एकीकडे तुम्ही आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक छातीचा कोट उभा करुन उभा आहे. कोण कोणाला घायाळ कऱणार, धारातीर्थी पाडणार याचा विचार करा. एकदा लढा पुकारल्यानंतर थांबायचं कुठे कळतं तो खरा यौद्धा, नेता असतो. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत, रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

13:08 (IST) 4 Jul 2022
भास्कर जाधवांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक

माझं आवडो अथवा किंवा नको ऐकून घ्यावं लागेल. तुमच्या नेत्याने ऐकलं पाहिजे सांगितलं आहे त्याचं पालन कराल अशी आहे. एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. मी गेले ८ दिवस झोपलेलो नाही. मी कधी विचलित, अस्वस्थ होत नाही, पण चेहऱ्यावर लपवू शकत नाहीत. एकनाथ शिंदे आजही मी शिवसेनेचा, बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा वारसदार असल्याचं सांगत आहेत. एकनाथराव तुमच्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्यात फार काही उठबस झालेली नाही. मी शिवसेनेत आलो आणि गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सत्कार केला. तुमच्या दालनात कधीही आपली भेट झालेली नाही. मी तुमची कामाची पद्धत कोकणातल्या पुरात पाहिली होती. तुम्ही मदतीला धावून जाता हे खरं आहे. मी तुमचं काम खूप मोठं काम पाहिलं आहे असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

13:02 (IST) 4 Jul 2022
राज्यातील पीक पाण्याची काय स्थिती आहे यावर बैठक घ्या – थोरात

राज्यातील पीक पाण्याची काय स्थिती आहे यावर सर्वात पहिली बैठक तुम्ही घेतली पाहिजे असा सल्ला थोरात यांनी सरकारला दिला आहे.

13:00 (IST) 4 Jul 2022
सत्तेच्या खेळात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं आहे – थोरात

सूरत, गुवाहाटी कुठे फिरलात यामध्ये मी जात नाही. सगळं होत असताना बंदूक आमच्या खांद्यावर ठेवली याचं वाईट वाटतं अशी खंत थोरात यांनी व्यक्त केली. सरकार कसं आलं हे सर्वांना माहिती आहे. सत्तेत आल्यानंतर तुम्ही लगेच आरे मेट्रो कारशेडचा निर्णय लगेच घेतला. त्यावर आंदोलन सुरु असून त्याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्ही गुवाहाटीत होता त्यामुळे माहिती नाही पण इथे दुष्काळ पडला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही पाऊसच नाही ही अवस्था राज्याची आहे, दुबार पेरणीची वेळ आली आहे त्यावर चर्चा करायला हवी होती. पण सत्तेच्या खेळात दुर्लक्ष झालं आहे अशी टीका थोरात यांनी केली.

12:57 (IST) 4 Jul 2022
“कोस्टल रोड, मेट्रो, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळच्या कामात कुठेही कमी पडलो नाही”

करोनामुळे आर्थिक निधी उपलब्ध होत नसताना एकीकडे जनतेला मदत करत होतो आणि महत्वाची कामंही सुरु होती. कोस्टल रोड, मेट्रो, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळच्या कामात कुठेही कमी पडलो नाही असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. एक पक्षाचं सरकार असलं तरी कुरघोडी, दबाव, समस्या असतात. महाविकास आघाडीत आम्ही संयमाने भूमिका घेत होते असंही ते म्हणाले.

12:55 (IST) 4 Jul 2022
करोनामध्ये दोन वर्ष गेली हे लक्षात घेतलं पाहिजे – बाळासाहेब थोरात

करोनाचं संकट आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत होतो. करोनामध्ये दोन वर्ष गेली हे लक्षात घेतलं पाहिजे. पाच वर्षाचाच सरकारचा कार्यकाळ असतो. मुंबई कशी सांभाळली याचं जागतिक पातळीवर कौतुक झालं. राज्यालाही आम्ही करोना संकटात योग्य सांभाळलं. सामान्य माणूस हे कधीच नाकारणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांनी चांगलं उदाहरण घालून दिलं असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

12:53 (IST) 4 Jul 2022
“महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला हे खरं आहे”

महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला हे खरं आहे. सत्तेत आल्यानंतर आम्ही अडीच वर्ष केलेल्या कामाचा मी उल्लेख करणार आहे असं बाळासाहेबांनी सांगताच सुधीर मुनगंटीवार यांनी व्यत्यय आणला. यावर त्यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली आणि शिस्त पाळली जावी असं सांगितलं.

12:51 (IST) 4 Jul 2022
“मुख्यमंत्री हे राज्याचे असतात आणि त्यांनीही तशाच पद्धतीने काम केलं पाहिजे”

महाराष्ट्राच्या संस्कृतीत ज्येष्ठ मंडळींना कायम आदराच स्थान दिलं जातं. पण आता छोटे नेतेही काहीतरी बोलून जातात. आपण काहीतरी काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हे राज्याचे असतात आणि त्यांनीही तशाच पद्धतीने काम केलं पाहिजे अशी अपेक्षा बाळासाहेबांनी व्यक्त केली.

12:50 (IST) 4 Jul 2022
मी काम करताना भेदभाव सहसा करत नाही : अजित पवार

अजित पवार म्हणाले, “मी आजपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना कुणाला बोललो नव्हतो. मात्र, आज मला सांगायचं आहे की भाजपासोबत गेल्यावर महाविकासआघाडी अनैसर्गिक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला असा पाढा वाचण्याचं काम केलं. वास्तविक देवेंद्र फडणवीस व भाजपाच्या इतर सर्व नेत्यांना माहिती आहे की मी काम करताना असा भेदभाव सहसा करत नाही. मी अर्थमंत्री असताना १ कोटी आमदार निधी मी २ कोटी केला. आघाडी सरकार आल्यावर ३ कोटी केला. दुसऱ्या वर्षी ४ कोटी, आता ५ कोटी केला. अजिबात भेदभाव केला नाही. २८८ आमदारांना सर्व पैसे मिळाले पाहिजे.”

12:49 (IST) 4 Jul 2022
देवेंद्र फडणवीस असे येतील असं वाटलं नव्हतं – बाळासाहेब थोरात

लोकशाहीने, राज्यघटनेने सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्वाला सर्वोच्च स्थानावर नेलं हे नाकारता येणार नाही. राज्यघटना त्यामुळेच आदर आणि श्रद्धास्थानी असली पाहिजे असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस असे येतील असं वाटलं नव्हतं असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

12:44 (IST) 4 Jul 2022
भाजपाने शिवसेनेसोबत राहून त्यांची ताकद वाढवली : अजित पवार

“भाजपाने शिवसेनेसोबत राहून त्यांची ताकद वाढवली. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करत असतो. आघाडी असली तरी एकनाथ शिंदे त्यांच्या गटाची ताकद वाढवण्यावर भर देतील, फडणवीस त्यांचा पक्ष वाढवण्यावर भर देतील,” असं अजित पवार म्हणाले.

12:43 (IST) 4 Jul 2022
“मला एकनाथ शिंदे यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे : अजित पवार

अजित पवार म्हणाले, “मला एकनाथ शिंदे यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. भाजपाची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून भाजपाने शिवसेनेच्या मदतीने टप्प्याटप्प्याने पक्ष वाढवत नेला. १९८० ला भाजपाचे १४ आमदार होते. १९८५ ला १६ झाले, १९९० ला १६ वरून ४२ झाले. १९९५ ला ६६ झाले, १९९९ ला परत ५६ झाले, २००४ ला ५४, २००९ ला ४६, २०१४ ला भाजपाचे १२२ आमदार आले. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. २०१९ मध्ये आता १०५ आमदार निवडून आले.”

12:31 (IST) 4 Jul 2022
एकनाथ शिंदेंचं इतकं समर्थन करता, मग तुमच्या मंत्रीमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं? : अजित पवार

राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, “शिंदेंमध्ये पात्रता होती तर मग तुमच्या काळात त्यांना एकच छोटसं खातं का दिलं होतं?” असा सवाल केला. वाचा सविस्तर बातमी…

12:22 (IST) 4 Jul 2022
शरद पवारांचे आभार मानतो – देवेंद्र फडणवीस

“मला आनंद आहे की शरद पवार यांनी देखील संघ, संघाची भूमिका, संघाची शिस्त याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी माझा उल्लेख गौरवपूर्ण केला त्याचा मला आनंद आहे. त्यांनी मला संघस्वयंसेवक म्हटलं, मी आहेच. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायचा विचार केला, पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. म्हणून मग मी फोन करून त्यांचे आभार मानले. राज ठाकरे यांची अजूनही तब्येत बरी नाही. ते नुकतेच रुग्णालयातून बाहेर आलेत. घरीच आहेत. मी त्यांची भेटही घेणार आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

12:20 (IST) 4 Jul 2022
ज्यांनी टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार आहे – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकार आले तेव्हाच मी सांगतो होतो की हे सरकारन टिकणार नाही. त्यावेळी मी पुन्हा येईन ही कविता म्हटली होती. त्यावर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली होती. पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. ज्यांनी टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार आहे.

12:07 (IST) 4 Jul 2022
येत्या काळामध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील याचा मला विश्वास – देवेंद्र फडणवीस

आजही एकनाथ शिंदे ४०० ते ५०० लोकांना भेटतात. मी एकनाथ शिंदेंना सांगितले की मुख्यमंत्र्यानी थोडी वेळ पाळली पाहिजे. मला असं वाटत आहे की याची त्यांनी सुरुवात केली आहे. येत्या काळामध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ते काम करतील याचा मला विश्वास आहे.

12:04 (IST) 4 Jul 2022
आमच्याविरोधात पोस्ट केली तर जेलमध्ये टाकू ही अवस्था काही काळ आपल्याला पाहायला मिळाली – देवेंद्र फडणवीस

सरकार हे संवेदनशील असले पाहिजे. कुणी आंदोलन करत आहे म्हणून ते आपले विरोधक आहेत असे मानने योग्य नाही. आंदोलक कधी आक्रमक झाले तर कारवाई करावी लागते. पण आमच्याविरुद्ध एक शब्द बोललात, एक पोस्ट लिहीली तर आम्ही ऐकून घेणार नाही. आमच्याविरोधात बोललात तर जेलमध्ये टाकू ही अवस्था काही काळ आपल्याला पाहायला मिळाली. पण लोकशाहीमध्ये दुसरा आवाज आहे तो ऐकून घेतला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

11:58 (IST) 4 Jul 2022
सीमाप्रश्नावरील आंदोलनात एकनाथ शिंदेंनी दबदबा निर्माण केला – देवेंद्र फडणवीस

२००४ पासून सलग चार वेळा एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मागच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्याहून महत्वाचं म्हणजे त्या काळात सीमाप्रश्नावर जे काही आंदोलन झालं त्या आक्रमक आंदोलनात एक नेता म्हणून दबदबा निर्माण केला. ४० दिवस बेल्लारीच्या तुरुंगात सीमाप्रश्नासंदर्भात कारावास भोगला आणि त्यातून एक मोठं व्यक्तीमत्व तयार झाले. १९९७ साली ठाण्यात नगसेवक, मनपा सभागृह नेते, आमदार, जिल्हाप्रमुख झाले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

11:51 (IST) 4 Jul 2022
प्रस्ताव मंजूर होण्यासाठी बाहेर राहून मदत करणाऱ्यांचे आभार – देवेंद्र फडणवीस

या सभागृहाने शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास केला त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी याच्या बाजूने मतदान केले त्यांचे आभार मानतो. पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

11:50 (IST) 4 Jul 2022
अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे मतमोजणीस अनुपस्थित

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप सभागृहाबाहेरच असल्याने त्यांना मतमोजणीला उपस्थित राहता आले नाही. मतमोजणीसाठी सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने या आमदारांना सभागृहात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही.

11:42 (IST) 4 Jul 2022
एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मतं

शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरवाला एकूण १६४ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी देखील १६४ सदस्यांनी मतदान केलं होते.

11:21 (IST) 4 Jul 2022
“थोड्याच वेळात तुम्हाला उत्तर देतो”; मत मोजणीच्यावेळी प्रताप सरनाईकांचा इशारा

विधानसभेत शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडल्यावर मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यावेळी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांचा क्रमांक येताच ईडी ईडी अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रताप सरनाईक यांनी अर्ध्या तासात तुम्हाला उत्तर देतो असा इशारा दिला.

11:14 (IST) 4 Jul 2022
सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला विश्वासदर्शक ठराव

एकनाथ शिंदे सरकारतर्फे सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. यावेळी विरोधी पक्षाने मतविभागणीची मागणी केली आणि ती अध्यक्षांनी मान्य केली.

11:08 (IST) 4 Jul 2022
तालिका अध्यक्ष पदाच्या सदस्यांची विधानसभा अध्यक्षांकडून घोषणा

तालिका अध्यक्ष पदी आशिष शेलार , योगेश सागर , संजय शिरसाट , संग्राम थोपटे आणि चेतन तुपे यांची निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी जाहीर केले

10:42 (IST) 4 Jul 2022
एकनाथ शिंदेसोबत आता शिवसेनेचे ४० आमदार

हिंगोलीचे आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडे १५ आमदार उरले आहेत.

10:32 (IST) 4 Jul 2022
शिवसेनला आणखी एक धक्का; आमदार संतोष बांगर एकनाथ शिंदे गटात सामील

उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीचे आमदार असलेले संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संतोष बांगर दिसल्याचे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

10:19 (IST) 4 Jul 2022
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे ठाण्यात जाणार

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. आंनद नगर चेक नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात ठाण्यात स्वागत करण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे एकनाथ शिंदे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निवास्थानी जातील.

10:16 (IST) 4 Jul 2022
एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीला सामोरे गेल्यानंतर विधानभवन येथे पत्रकार परिषदेला घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. शिवाजी पार्क मधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत.

10:08 (IST) 4 Jul 2022
“भाजपा सेना युतीचा विजय असो” घोषणा देत भाजपाचे आमदार विधानभवनात दाखल

वहुमत चाचणीसाठी भाजपाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. भाजपा सेना युतीचा विजय असो अशा घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.

10:08 (IST) 4 Jul 2022
“शिवसेना म्हणजे युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(सोमवार) दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपा यांच्यावर टीका केली. “शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही.” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे गटाला आव्हान देखील दिलं. याचबरोबर, “हे काय रामशास्त्रींचं राज्य नाही, ही राजकीय चढाओढ आहे.” असं म्हणत भाजपावर देखील त्यांनी निशाणा साधला. वाचा सविस्तर बातमी…

09:55 (IST) 4 Jul 2022
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी

शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी सभापतींकडे केली आहे. आमदारांना निलंबनाची नोटीस बजावली जाईल, अशी पुष्टी सभापती कार्यालयाने दिली आहे.

09:38 (IST) 4 Jul 2022
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना खरी – संजय राऊत

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना खरी आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की भारताच्या राजकारणामध्ये २८० निर्माण झाल्या पण दोनच सेना टिकल्या. भारतीय सेना आणि शिवसेना. त्यामुळे दोनच सेना या कायम राहतील, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

09:03 (IST) 4 Jul 2022
विश्वासदर्शक ठरावही भक्कम बहुमताने जिंकणार – देवेंद्र फडणवीस

आज विधानमंडळात मतदान झालं. त्यामध्ये राहुल नार्वेकर १६४ मतं घेऊन निवडून आले. आमचे दोन सदस्य आजारी असल्याने दोन सदस्य आले नाहीत. एकूण १६६ लोकं आमच्या युतीच्या पाठिशी भक्कमपणे आहेत. सोमवारी विश्वासदर्शक ठराव आम्ही मांडत आहोत. हा ठरावही भक्कम बहुमताने मंजूर होईल हा मला विश्वास आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

08:45 (IST) 4 Jul 2022
मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा – शरद पवार

भाजपाचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपाच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे. ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता शिंदे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असा संदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला.

08:45 (IST) 4 Jul 2022
एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते – शरद पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल, पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले आहे.

08:38 (IST) 4 Jul 2022
‘शिंदे सरकार कधीही कोसळेल’ ; शरद पवार यांचे भाकीत

राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवत मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला. वाचा सविस्तर….

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गट प्रथमच समोरासमोर आले होते.