राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच असला, तरी देखील करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या ही दुप्पटीपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. राज्यात आज १ हजार ९२७ नवे करोनाबाधित आढळले असून, ४ हजार ११ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३७ टक्के आहे.

याशिवाय आज दिवसभरात राज्यात ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख ३० हजार २७४ वर पोहचली आहे. तर, राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४१ हजार ५८६ असून, १९ लाख ३६ हजार ३०५ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय, आतापर्यंत ५१ हजार १३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,०६,९९२ नमुन्यांपैकी २० लाख ३० हजार २७४ नमूने (१३.८० टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, सध्या राज्यात १ लाख ८९ हजार २८८ जण गृह विलगीकरणात व २ हजार १२१ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

तर,  पुणे शहरात आज दिवसभरात १७६ नवे करोनाबाधित आढळले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. शहारतील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ लाख ९२ हजार १८१ वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत ४ हजार ७६८ जणांचा मृत्यू झाला आहे . दरम्यान आज २४७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजअखेर १ लाख ८५ हजार ६७८ जण करोनामुक्त झाले आहेत.