राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही मोठ्यासंख्येने दरररोज भर पडत आहे. राज्यात आज दिवसभरात ४४ हजार ४९३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ५५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, २९ हजार ६४४ नवीन करोनाबाधित वाढले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२४,४१,७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,२७,०९२ (१७.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,९४,४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६७,१२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाउन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याआधी राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.