Maharashtra Top 5 Political News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सदर अपघाताबद्दल संशय व्यक्त केला असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
विमान ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?
संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद वाटतो. त्यामागचे रहस्य समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवार हे भाजपाला सोडून पुन्हा शरद पवारांकडे आले असते तर तो भाजपाच्या ऑपरेशन लोटसचा सर्वात मोठा पराभव ठरला असता. त्यामुळे अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? असे प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
भाजपाचे प्रत्युत्तर
भाजपाचे प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. “उद्या भूकंप किंवा त्सुनामी आली तरी संजय राऊतांना तो ऑपरेशन लोटसचा भाग वाटू शकेल. पूर आला तरी त्यांना ऑपरेशन लोटस वाटू शकते. संजय राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर केले पाहिजेत. शरद पवार यांनीही हा अपघात असून घातपात नाही, हे मान्य केले आहे. संजय राऊत हे शरद पवारांपेक्षा मोठे आहेत का? असा सवाल बन यांनी उपस्थित केला.

