मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती, गेल्या पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता कुणावर गुन्हा दाखल करायचा, असा सवाल राष्ट्रवादीचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या प्रचारार्थ बेलवंडी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. श्रीगोंद्यातून आ. राहुल जगताप यांनी आपले तिकीट घनश्याम शेलार यांना देऊन राजकीय संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. घनश्याम शेलार हे सत्ता नसताना ३५ वर्षांपासून लोकांसाठी झटत आहेत. त्यामुळे निश्चितच श्रीगोंद्याच्या आखाडय़ात शाहू फुले विचारांचा विजय होणार आणि शेलार आमदार होणार असा विश्वास कोल्हे यांनी शेवटी व्यक्त केला. राहुल जगताप म्हणाले की, कुकडी कारखान्यावर प्रशासक नेमले अशी नोटीस पाचपुतेंनी दाखवावी. मी पाचपुतेंचा शिपाई म्हणून काम करीन. खा अमोल कोल्हे यांची बेलवंडीतील सभा प्रचाराची सभा नसून घनश्याम शेलारांच्या विजयाची सभा आहे. घनश्याम शेलार म्हणाले की, पवारांनी पाचपुतेंना पाच वेळा मंत्रिपद दिले, पाचपुतेंचा राजकारण करण्याचा हेतू स्वच्छ नाही. साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे संसार त्यांनी उद्ध्वस्त केले. यावेळी बाबासाहेब भोस, अंबादास दीपक भोसले, बाबासाहेब गुंजाळ, हरिदास शिर्के, दादासाहेब दरेकर, अनिल वीर, गणेश बेरड, ऋषिकेश गायकवाड, संगीता खामकर, सुदाम कुटे, शंकर पाडळे यांची भाषणे झाली. फडणवीस यांना आपले सरकार जाणार हे लक्षात येताच मोदी शहांच्या सभा आयोजित केल्या पण या मस्तावलेल्या मंडळींचा कडेलोट केल्याशिवाय सोडणार नाही. - खा. डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी कॉंग्रेस