सांगली : महाविकास आघाडीचं सरकार पडतेय, त्याचं मला अजिबात दु:ख नाही. कारण महाविकास आघाडीचे सरकार जनताभिमुख राहिले नसल्याने आम्ही दोन महिन्यांपूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. मात्र हे सरकार पडताना ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे भाजपाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून काम करत असल्यासारखे दिसत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपावर केली आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी रात्री मिरजेत आले असता शेट्टी माध्यमांशी अनौपचारिक बोलत होते. या वेळी ते म्हणाले,की भाजपा ज्या पद्धतीने पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडतेय, त्याचं मला अजिबात दु।ख नाही. कारण महाविकास आघाडीचे ेसरकार जनताभिमुख राहिले नसल्याने आम्ही दोन महिन्यांपूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. शिवसेनेतील फुटीबाबत बोलताना ते म्हणाले, ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात ही प्रवृत्ती वेगाने वाढतेय आणि देशांमध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे. एखादा पक्ष अथवा संघटना उभी करताना काय करावे लागते याचा अनुभव आपण स्वाभिमानी संघटनेच्या स्थापनेतून घेतला आहे. आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठय़ा पक्षावर सुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा वेळीच काळाची पावले ओळखावीत असेही ते म्हणाले. महापुराचा अनुभव घेऊनही आपण शहाणपणा शिकलो नाही, शासन व्यवस्थेने कोणताही धडा घेतलेला नाही. आता तर महामार्गाच्या निर्मितीमुळे कृष्णा नदीची पाणी वहन क्षमता रोखली जाणार आहे. याचा परिणाम सांगलीतील विश्रामबागपर्यंत महापुराची झळ बसू शकेल असेही शेट्टी म्हणाले.