चंद्रपूर जिल्ह्यात पुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ५६९ गावातील ८९ हजार २२६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यात २ कोटी ३१ लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांत वैनगंगा तसेच प्राणहिता व इतर उपनद्यांना पूर आल्यामुळे महावितरणाच्या यंत्रांचे सुमारे २ कोटी ३१ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच, पुरामुळे सुमारे ५६९ गावे बाधित झाली असून सुमारे ८९ हजार २२६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. ब्रम्हपुरी व किन्ही उपकेंद्र पूर्णपणे पाण्यात बुडाले असून या भागातील ग्राहकांना इतर उपकेंद्रांद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे. पुरामुळे बाधित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत.

तसेच यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या भागात पुराचे पाणी अद्याप साचून आहे त्या भागात खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. पाणी कमी होताच या ठिकाणी महावितरणकडून तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
पूर असलेल्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मोहीम जोरात सुरू असून, पुराचे पाणी ओसरल्यावर सर्वच भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे महावितरणकडून कळवण्यात आले आहे.