मनमाड : विश्वशांतीसाठी नागराज गौडा हा अवलिया भारत भ्रमंतीवर असून त्याने सायकलीने आतापर्यंत १२ राज्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. मालेगाव येथून तो मनमाड शहरात दाखल झाला. येवला-कोपरगावमार्गे शिर्डी येथे तो जाणार आहे. नागराज गौडा (६०) हे मूळचे कर्नाटकचे असून सध्या ते मुंबईतील अंधेरी येथे राहतात. विश्वशांती आणि राष्ट्रीय एकात्मता, पाणी वाचवा असा संदेश देत त्यांनी २०१७ पासून सायकलीवर भारताच्या एकात्मतेसाठी भारत भ्रमण सुरू केले. एक वर्ष हा प्रवास सायकलवर सुरू होता. पण २०१९ मध्ये करोना संक्रमण सुरू झाल्याने त्यांना आपला प्रवास थांबवावा लागला. करोनाचा प्रभाव कमी झाल्यावर ते पुन्हा भारत भ्रमंतीवर निघाले आहेत. गौडा यांनी आतापर्यंत १२ राज्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. विश्वशांतीसाठी सर्वधर्मसमभावाची भावना जोपासणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांचे मत आहे. अंधेरी येथून त्यांनी हा प्रवास सुरू केला. त्यानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली प्रदेशाचा समावेश आहे. गौडा यांनी हरिद्वार येथे कुंभमेळय़ासाठीही हजेरी लावली. करोनाची लाट आल्याने त्या ठिकाणी अडकून पडले होते. पण त्यांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. नागपूरमार्गे सध्या महाराष्ट्रात आले आहेत. नागपूर येथून अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, मालेगाव या मार्गाने ते मनमाड शहरात दाखल झाले. प्रवासादरम्यान अनेक कडू-गोड अनुभव आल्याचे गौडा यांचे म्हणणे आहे. अनेकांनी सामाजिक दायित्व दाखवले. मदतही केली. धर्मशाळेत, मंदिरात निवासाची व्यवस्था करण्यात आली. काहीजण मात्र मस्करी करतात. पण आपण त्याकडे लक्ष देत नसल्याचे नागराज यांनी सांगितले.