Manoj Jarange Patil Maratha Reservation hunger strike: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत, ३० मे पासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. देशात कुठेच झालं नाही, असं कठोर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट करतान जरांगे-पाटील यांनी “उष्माघातानं बळी गेल्यास त्याला सरकार जबाबदार असेल”, असा इशारा दिला. उपोषणादरम्यान, मराठा समाजातील बांधवांनी अंतरवाली सराटीकडे येऊ नये, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले.
३० मे पासून रणरणत्या उन्हात उपोषण – जरांगे-पाटील
आगामी उपोषणाबाबत माहिती देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी मंडपात उपोषण न करता प्रखर उन्हात उपोषण करण्याची आक्रमक भूमिक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. “यावेळी ३० मे पासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार आहे. उपोषणादरम्यान मेलो तर मेलो. उष्माघातानं बळी गेल्यास त्याला सरकार जबाबदार असेल. यावेळी सरकारचा नाही तर माझा तुकडा पडेल”, असे जरांगे पाटील म्हणाले.
देशात यापूर्वी झाले नाही असं उपोषण होणार – जरांगे-पाटील
“उन्हात किती त्रास होईल याचा विचार करत नाही. एक तर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझा, बाज टाकून रखरखत्या उन्हात मी यावेळी उपोषण करणार आहे. पायात काही चप्पल नसेल, अन्नपाणी नसेल, काय व्हायचं होऊ. मराठा समाजातील मुलांचा सरकारने उन्हाळा केला आहे. मराठा समाजातील बांधवांनी उपोषणादरम्यान अंतरवाली सराटीकडे येऊ नये”, असे मनोज-जरांगे पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. “देशात यापूर्वी अशा प्रकारचे, कठोर आणि इतक्या टोकाचे उपोषण झाल्याचे आठवत नाही. तेवढ्या टोकाचं हे उपोषण होईल”, असेही जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे-पाटलांनी उपस्थित केले काही प्रश्न
मला चर्चा नको अशी भूमिका स्पष्ट करताना, “५८ लाख नोंदी निघाल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार आहात का? कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्यांना वैधता देणार आहात का? हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर काढला त्याचे प्रमाणपत्र देणार आहात का? त्याची वैधता देणार का?”, असे सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केले. “मराठा आरक्षण देताय म्हणजे काय करताय? असा प्रश्न करत मराठा समाजाची मते हवीत पण आरक्षण द्यायला नको”, असेही जरांगे-पाटील म्हणाले.
आरपारची लढाई करण्याची घोषणा
तुमच्याकडून हल्ले केले जातात आणि आमच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातात? सातारा संस्थानाचे गॅझेट लागू केले जात नाही? असा प्रश्नही जरांगे-पाटलांनी उपस्थित केले. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायाला किती वेळ लागतो? असा सवाल त्यांनी केला. आमचा पाच पिढ्यांचा बॅकलॉग कोण भरुन काढणार? असेही पाटील म्हणाले. यावेळी आरपारची लढाई करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
