राज्यसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. अपक्ष आमदारांनी आपल्यालाच मतदान करावं, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. असं एकंदरित राजकीय वातावरण असताना अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. अनेक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अपक्ष आमदारांनी सर्व पत्ते पिसून ठेवले असून ते फक्त टाकणं बाकी आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. रवी राणा यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

त्यांनी म्हटलं की, “राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. १० तारखेला हे पत्ते केवळ टाकायचे आहेत. अपक्ष आमदारांनी मिळून अपक्ष खासदार संजय काकडे यांना निवडून दिलं होतं. संजय काकडे यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी अपक्ष आमदारांनी मोठी ताकद लावली होती, त्यामध्ये मीही होतो. त्यामुळे यावेळी देखील अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. १० तारखेला ते फक्त टाकायचे आहेत. अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात आहेत, असंही ते म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले…?
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्यांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे, अशा अपक्ष आमदारांवर भाजपाकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचं संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. “महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषं दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत”, असंही राऊत म्हणाले.