Raj Thackeray on Marathi Manus : मराठीच्या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक असलेल्या राज ठाकरे यांनी दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना रोखठोक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर दिलखुलास भाष्य केलंय. तसंच, मुंबईत कमी होणाऱ्या मराठी माणसाबद्दलही त्यांनी भाष्य केलं. मुंबईतील मराठी माणूस बेसावध असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच, त्याने सावध होऊन कानोसा घेतला पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलंय.
२०२५ साली मुंबईत मराठी माणूस २७ टक्के, बाकीचे ६३ टक्के आहेत. २०२० पासून ही टक्केवारी कमी होतेय. मुंबईतून मराठी माणूस नामशेष व्हायला किती वर्षे लागतील असा उपहासात्मक प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मुंबईतून मराठी माणूस नामशेष नाही होणार. सध्याच्या आकडेवारीनुसार २७ टक्के मराठी माणूस मुंबईत असला तरीही ३५ ते ४० टक्के मराठी माणूस मुंबई शहरात राहतो. टक्का कमी झाला यात काही वाद नाही. पण बाकिच्यांचाच टक्का वाढला आहे, हे वास्तव नव्हे.”
“मुंबईवरची मराठी छाप पुसली जाऊ शकत नाही. पुसली जाण्याची हिंमतही कोणी करू नये. मुंबईला मिठीत घेतलेला महाराष्ट्र आहे. पण मुंबईत मराठी माणूस बेसावध आहे. त्याने सावध होण्याची आवश्यकता आहे. कोण काय करतंय, काय बोलतंय, याकडे त्याने लक्ष देणं गरजेचं आहे. सतर्क राहणं आवश्यक आहे”, असं आवाहनही त्यांनी मराठी माणसाला केलं.
मुंबईतील मराठी माणूस टॉवर्समध्येही राहतो
“गिरगावातील मराठी माणूस गेला बाहेर असं म्हणतो. पण ही परिस्थिती फक्त मुंबईपुरती नाही. प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे. कारण, लहान घर असतं, कुटुंब मोठं होत असतं, मुलं होतात, ती मोठी होतात. त्या घरात राहू शकत नाहीत. आता इथे शिवाजी पार्क, दादर येथील टॉवर्समध्ये अमराठी माणसं राहतात, असं आपल्याला वाटतं. पण तिथे मराठी माणूसही राहतो. तिथे मराठी माणूस राहत नाही असा आपला भ्रम आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.
मराठी माणसाला माझी हात जोडून विनंती आहे. सतर्क राहण्याची फार गरजेचं आहे, यावर राज ठाकरेंनी पुन्हा जोर दिला.