शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांचे स्मरण करत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे कार्यक्रम केवळ मुंबईत नाहीत, देशभरात, जिथे जिथे मराठी माणूस आहे, पोहचलाय त्या जगाच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जातं. मराठी माणसाला या मुंबई शहरात महाराष्ट्राच्या राजधानीत, त्यांनी स्वाभिमानाने, ताठ मानाने जगता यावं यासाठी ५५ वर्षे आपल्या आयुष्यातली झीज सोसली. संघर्ष केला, राजकीय लढाया केल्या, तुरुंगवास भोगला. प्रबळ सत्तेशी दिल्ली आणि महाराष्ट्रात अक्षरशा युद्ध केलं. तेव्हा कुठं ही मुंबई मराठी माणसाची होऊ शकली आणि आजही या मुंबईवर मराठी माणसाचा पगडा आहे.”

हेही पाहा : “ह्या मनगटास तूच शिकवली लढण्याची वहिवाट…” बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून राज ठाकरेंचा ‘तो’ भावनिक व्हिडीओ ट्वीट!

याचबरोबर, “लढत रहा, रडू नकोस, संकटाच्या छातीवर पाय रोवून उभा रहा. हा बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणसासाठी मंत्र होता. आज जे मराठी अस्मिता म्हणून आपण जगतो आहोत, ती त्यांची देणगी आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आजन्म ऋणी राहील आणि कृतज्ञ राहील.” असंही संजय राऊतांनी म्हटलं.

हेही वाचा – “शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना…” बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांचा विरोधकांवर निशाणा!

याशिवाय, “स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होतील, राजकारण होईल. पण आमच्या सगळ्यांच्या हृदयावर जे बाळासाहेबचं चित्र कोरलेलं आहे, ते अजरामर आहे. माझ्यासारखी जी माणसं आहेत, माझं संपूर्ण आयुष्यभर मी त्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी आम्हाला घडवलं, जगामध्ये फिरण्यालायक बनवलं. ओळख दिली तर ते तर सदैव त्यांचे ऋणीच आहेत. आम्ही जे काय घडलो ते त्यांच्यामुळेच घडलो.” असं संजय राऊत म्हणाले.

असे नेतृत्व शतकातून एकदाच जन्माला येतात –

“बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली नसती, शिवसेना ही चार अक्षरं नसती तर महाराष्ट्राच्या राजकारणात, गेली ५० वर्षे जी गरम रक्ताची तरुणांची पिढी दिसते आहे ती कधीच आली नसती. बाळासाहेबांनी अत्यंत साध्या आणि फाटक्या तरुणांना नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री बनवलं. कोणतही पाठबळ नसताना, राजकीय पाठबळ नसताना सुद्धा बाळासाहेबांनी बनवलं. जो चमत्कार बाळासाहेबांनी घडवला, असे नेतृत्व शतकातून एकदाच जन्माला येतात ते बाळासाहेब ठाकरे होते.” असं म्हणत संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi people all over the world will forever be indebted to shiv sena chief balasaheb thackeray sanjay raut msr
First published on: 23-01-2023 at 10:46 IST