प्रदीप नणंदकर लता मंगेशकर साहित्य नगरी उदगीर: खेडय़ातील मराठी शाळा अडचणीत आल्या असून शिक्षणाचा हक्क व्यवस्था हिरावून घेत असल्याची खंत ज्येष्ठ लेखक राजन गवस यांनी व्यक्त केले. विनोद शिरसाट व प्रमोद मुनघाटे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. वैचारिक साहित्याच्या दुष्काळाचे काय, एकेकाळी विचारवंताचा देश होता तो आता भ्रमिष्टांचा म्हणायचा का, असा सवाल उपस्थित करत गवस म्हणाले, की सध्या काही भागात इंग्रजी शाळा हैदोस घालत आहेत. ‘का भुललासी वरलीया रंगा’ अशा अवस्थेत खेडय़ातील माणूस अडकला आहे. त्याला खरा मार्ग दाखवला जात नाही. चांगला शिक्षक मिळतं नाही कारण शिक्षक प्रशिक्षण व्यवस्था नीट विकसित करू शकलो नाही. मराठी शिकवण्याची पद्धत आपण अंमलबजावणी पातळीवर आणली नाही अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. वयाच्या १६ व्या वर्षांपासून कवी, कथा, कादंबरी, समीक्षक, विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता हा प्रवास मुलाखतीतून उलगडला गेला. ग्रामीण शब्दाला आपला विरोध आहे कारण ग्रामीण ऐवजी कृषिजन संस्कृती हा शब्द आग्रहाने मांडत आहे. कृषिजन संस्कृती व नागरी संस्कृती या दोन संस्कृती भिन्न आहेत. कृषिजन संस्कृतीत देण्याला महत्त्व आहे. वाटण्याला महत्त्व आहे तर शहरी संस्कृती अगदी उलट आहे. आमच्या लहानपणी शाळा, महाविद्यालये ऊर्जा केंद्रं होती, शिक्षक अंत:करणपूर्वक काम करत असत. आपल्यातील लेखक यातूनच घडला. सध्याच्या काळात सर्वानीच अंतर्मुख होण्याची गरज गवस यांनी व्यक्त केली.