चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त चंद्रपूरच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट तथा सहयोगी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भस्तरीय सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा शुक्रवारी, २० मे रोजी सायंकाळी ७ वाजता दाताळा येथील श्री बालाजी मंदिर देवस्थानजवळील तिरुपती बालाजी नगरीच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. तर २२ मेपर्यंत विविध आनंददायी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती आयोजक माजी खासदार नरेश पुगलिया यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. श्री वेंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट, श्री गौरवबाबू पुगलिया वर-वधू सूचक केंद्र, बीपीएम मजदूर ट्रस्ट, बल्लारपूर व आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट वरोराचा विदर्भस्तरीय सर्वधर्मीय भव्य सामूहिक विवाह मेळाव्यात आयोजनात सहभाग आहे. या सोहळय़ात आतापर्यंत १६३ जोडप्यांनी नोंदणी केली. ती आता २०० च्यावर जाण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात पदार्पण करणाऱ्या या नवदाम्पत्यास आपण शुभाशीर्वाद व मंगलमय शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन पुगलिया यांनी केले आहे. त्यासोबतच १८ मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा विविधांगी सुश्राव्य गायनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १९ मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत उस्ताद मुनाव्वर मासूम व कव्वाला रूबी ताज यांचा कव्वालीचा कार्यक्रम श्री तिरूपती बालाजी नगरीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. २० मे रोजी रात्री ८ वाजेपासून छप्पन भोग स्वरूची भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बालाजी मंदिरात पंचम ब्रह्मोत्सव सोहळा श्री वेंकटश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्टद्वारा संचालित दाताळा परिसरातील श्री बालाजी मंदिर येथे भगवान बालाजीच्या मूर्तीचा अभिषेक होऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त १८ मे ते शुक्रवार २० मेपर्यंत पाचवा ब्रह्मोत्सव उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.