Ajit Pawar on Speech : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोन्ही उपमख्यमंत्र्यांचे नियोजित भाषण ऐनवेळेला रद्द करण्यात आले. यामुळे मोठी चर्चा रंगली आहे. त्याआधी रायगडावरील कार्यक्रमातही अजित पवारांना भाषण करू दिलं नाही. आता या प्रकरणांवरून चर्चा सुरू असताना अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते आज सायंकाळी माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “मी आणि एकनाथ रावांनी ठरवलं आहे की इथून पुढे कितीही घाईगडबड असली तरीही दोन-दोन मिनिटे भाषण करायचंच. जेणेकरून परत असा मुद्दा उपस्थित होणार नाही. वेळेचं गणित बसवून निर्णय घेतला जातो. परवा राज्यपाल बोलले, मुख्यमंत्री बोलले तो कार्यक्रम संपला. आम्हाला आश्चर्य वाटतं की आमच्याकडे एवढं लक्ष आहे. इथून पुढे कोणताही कार्यक्रम असला तरीही आम्ही थोडंसं तिथे बोलणार आहोत.”
दरम्यान, चैत्यभूमीवरील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे भाषण होणार होते. परंतु, ऐनवेळी या दोघांचेही भाषण रद्द करण्यात आले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतरही उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा होती.
रायगडावरही अजित पवारांना डावललं
छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथीच्या निमित्ताने आज (१२ एप्रिल) रायगडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेकांनी भाषण केलं. मात्र, अजित पवारांनी भाषण केलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली. पण अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे अजित पवारांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. यावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं होतं.
याबाबत ते म्हणाले होते, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे कसं गेलं पाहिजे? या संदर्भाने रायगडावर चर्चा झाली. तसेच रायगडावर सर्वांनी भाषणं केले. पण वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केलं नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले.”