मेहकर : कोणत्याही नात्यात गैरसमज, संशय निर्माण झाला तर त्या नात्यात अंतर व दुरावा निर्माण होतॊ. संशय लवकर दूर झाला नाही तर नाते संबंध विकोपाला जाते. त्यातून अनेकदा अनर्थ होतॊ अन होत्याचे नव्हते होते. हीच बाब एखाद्या छोट्या संसाराला देखील लागू होते. पती पत्नी आणि छोटे बाळ म्हणजे एक स्वर्गीय नातं असते. मात्र, या नात्यात संशय शिरला की हे नाते विस्कटते, अनेकदा संसारच उध्वस्त होतॊ. याची प्रचिती आणणारा भीषण व थरारक घटनाक्रम मेहकरमध्ये घडला.

अनेक वर्षे सुखाने संसार केल्यावर एका व्यक्तीच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले अन त्याचा अतिरेक झाल्याने त्याने आपल्या पत्नीसह, गोंडस चिमुकल्याची निर्घृणपणे हत्या केली. धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याने आपल्या सुखदुःखाची भागीदार असलेल्या पत्नीचा आणि संसारात आनंद फुलविणाऱ्या चार वर्षीय मुलाला संपविले.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपी पतीने आपल्या पत्नीसह अवघ्या चार वर्षांच्या पोटच्या गोळ्याची कुऱ्हाडीने वार करून खून केला. राहूल हरी म्हस्के असे आरोपीचे नाव आहे. मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेला राहूल (वय ३३ वर्षे) याचा विवाह रुपाली (वय २८ वर्षे) हिच्याशी झाला होता. प्रारंभी या दोघांनी सुखाने संसार केला. त्यांच्या या सुखाच्या वेलीवर रियांश नावाचे एक फूलही उमलले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशयाच्या भूताने जन्म घेतला. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा, विसंवाद निर्माण झाला. त्यांच्यात वारंवार खटके उडायला सुरुवात झाली.

२९ डिसेंबरच्या उत्तर रात्री शिक्षक कॉलनी मधील रहिवासी साखर झोपेत होते. उत्तररात्री पहाटे अडीच वाजताच्या वाजताच्या सुमारास राहुलने रागाच्या भरात हातात कुऱ्हाड घेऊन पत्नी रुपाली आणि निष्पाप पुत्र रियांश (वय ४ वर्षे) यांच्या डोक्यावर सपासप वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावरच आरोपी राहुल भानावर आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधला. मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आरोपी राहुलला ताब्यात घेतले. रियांशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा तपास मेहकर पोलीस करीत आहे.