दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये पावसाने जोर धरल्यामुळे सणातील उत्साह कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य, वेस्टर्न आणि हार्बर रेल्वे दहा ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील २४ तासात मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. Heavy rainfall warning in the city by IMD. We request Mumbaikars to avoid venturing near the sea or walking in water logged areas. For any assistance do call 1916. Take care Mumbai. #weatherupdate #MCGMUpdate #MumbaiRain #MumbaiRainsLiveUpdates — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 4, 2019 पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. राधानगरी धरणाच्या सहा नंबरच्या दरवाजातून १४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग , तर मुख्य दरवाजातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणं पुन्हा तुडुंब भरून वाहू लागली आहेत. त्यामुळं धरणांमधुन पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग सत्तावीस हजार क्युसेक्स वेगाने वाढवण्यात आला आहे. Dear Mumbaikars, The IMD authorities have indicated high rainfall weather for Mumbai and other adjoining districts for the next 2 days. Please take adequate precautions and ensure safety.#Dial100 in case of an emergency. Take care Mumbai. — Mumbai Police (@MumbaiPolice) September 3, 2019 राज्याच्या विविध भागात आठवडाभर संततधार पाऊस सुरू राहणार आहे. मंगळवारीदेखील पाऊस होता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील विविध भागात जोरादार पाऊस पडला. पुणे आणि मुंबईत सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. येते दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरावर व त्या लगतच्या ओडिशाच्या किनारपट्टीवर सलग सातवे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरासह लगतची ओडिशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगालवर ते स्थित आहे. परिणामी, मध्य आणि पूर्वेकडील भागात मान्सून सक्रिय झाला आहे. पाहा व्हिडीओ - दरम्यान, पुढील २४ ते ४८ तासांत मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्यात हलका पाऊस राहील. मराठवाड्यातील काही भागांत एक ते दोन मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर, पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे अधून मधून पाऊस पडतच राहील.