सावंतवाडी : मुंबईत हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी १६ कामगार संघटनांनी एकत्र येत लढा तीव्र केला आहे. या लढ्याचा भाग म्हणून येत्या १० मार्च रोजी विधिमंडळ अधिवेशनावर भव्य ‘निर्धार मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चात सिंधुदुर्गातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी येथे केले.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार व वारसांची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर खजिनदार निवृत्ती देसाई, ऑफिस सेक्रेटरी मधुकर घाडी,सूर्यकांत बांदलकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते.
मुंबईतच घर हवे; ‘शेलू-वांगणी’ला विरोध:
मार्गदर्शन करताना बजरंग चव्हाण म्हणाले की, “गिरणी कामगारांना मुंबईबाहेर शेलू किंवा वांगणी येथे घरे नकोत, तर ती मुंबईतच मिळाली पाहिजेत. यासाठी १६ संघटनांचा संयुक्त लढा सुरू आहे. सुमारे १ लाख ७० हजार कामगारांनी घरांसाठी अर्ज केले असून, त्यापैकी १ लाख २५ हजार अर्ज पात्र ठरण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबर १९८१ च्या संपानंतरच्या कामगारांनाही न्याय मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
सरकारने गिरणी कामगारांचा अंत पाहू नये:
संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात गिरणी कामगारांचा मोठा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही हे कामगार अग्रभागी होते. आज गिरणी कामगार मरणाच्या दारात उभा आहे, अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरांचा प्रश्न तात्काळ सोडवून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. लोकप्रतिनिधींनीही हा प्रश्न संसद आणि विधानसभेत लावून धरावा.”
सभेत कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
या सभेला जिल्ह्यातील सुमारे १५० हून अधिक कामगार व वारस उपस्थित होते. यावेळी गिरणी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी सुरेखा भिसे, लॉरेन्स डिसोझा, सुमन मुळीक, सतीश निकम, रामचंद्र कोठावळे, महादेव सावंत यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अभिमन्यू लोंढे यांनी मानले. तर पाहुण्यांचे स्वागत सुभाष परब, विश्वनाथ कुबल, रामचंद्र कोठावळे यांनी केले. या सभेला गणपत गावडे, सोनू दळवी, सुभाष नाईक, गोविंद पालव, रेखा लोंढे-देसाई, अशोक दळवी,गिता परब, कविता गावडे, प्रकाश राऊळ, प्रेमानंद परब, गुरूनाथ राऊळ,राजन देसाई,हरी कुबल, देवराव देसाई, मुकुंद बाईत, जयश्री सावंत, दशरथ नाईक,यांच्यासह १५० कामगार व वारस उपस्थित होते. १० मार्चच्या मोर्चाला सिंधुदुर्गातून मोठी उपस्थिती लावण्याचा निर्धार कामगार व वारसांनी यावेळी केला.
