नगर : आरक्षण संदर्भातील वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने काही अडचणी निर्माण झाल्या असल्या, तरी विद्युत सहायक पदाच्या भरतीबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज, रविवारी राहुरीत आयोजित करण्यात  आला होता. त्या वेळी ते बोलत होते. राज्यातील विद्युत कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना निषेधार्ह असून आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. मात्र त्याबरोबरच बिलाच्या वसुलीसाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद ठेवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

मंत्री तनपुरे म्हणाले की, करोनाकाळात जीव धोक्यात घालून ऊर्जा खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम केले. प्राणाची बाजी लावून ग्राहकांना विद्युतसेवा दिली तर काही जणांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महावितरण, पारेषण व निर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढू. राहुरी विभागात १४ हजार  विद्युत ग्राहक आहेत, तुलनेत केवळ १४ कर्मचारी काम करतात. याची आपणास कल्पना असून नवीन भरती झाल्यानंतर अधिक सुलभता येईल. भौगोलिकदृष्टय़ा नगर जिल्हा मोठा असला तरी ऊर्जा विभाग हे आव्हानात्मक काम करत आहे, ऊर्जा विभाग हा आव्हानात्मक असून मी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ऊर्जा खात्याची मागणी केली होती. कोणताही अनुभव नसताना अभ्यास करून मार्गक्रमण करत आहे. राहुरी तालुक्यातील मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जात होता, त्या अनुभवानुसार ग्राहकांच्या अपेक्षा आहेत. विजेची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत असल्याने मतदार संघात १० नवीन उपकेंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याचे काम सुरू होईल. या वेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागोराव मगर, प्रसाद रेशमे, सुनील काकडे यासह तिन्ही कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते