कृषी पंपास दिवसा १० तास वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करत असलेल्या आंदोलनाकडे महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप करत गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना आज(रविवार) हातकंणगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी काळे झेंडे दाखवत व त्यांचा वाहनांचा ताफा रोखत निदर्शने केली. कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयासमोर वीज संबधी विविध या मागणीसाठी राजू शेट्टी २२ फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन करीत आहेत. याशिवाय जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर, चक्का जाम, सरकारी कार्यालयात साप सोडणे यासारखे आंदोलनं केली गेली आहेत. तर आज कोल्हापूरचे पालकमंत्री पाटील यांना काळे झेंडे दाखवित गाड्यांचा ताफा अडवण्यात आला. सतेज पाटील यांनी तोंडावर गोड बोलत जाणीवपुर्वक आंदोलनाकडे दुर्लक्ष करून शासन स्तरावर कोणतेच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे, धनाजी पाटील, संपत पवार, सुरेश शिर्के आदी संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्जा मंत्र्यांना पाठवले बैठकीचे पत्र - माजी खासदार राजू शेट्टी आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १० तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या बेमुदत आंदोलनावर चर्चा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सबंधित सचिव व अधिकारी आणि माजी खासदार राजू शेट्टी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक तत्काळ आयोजित करावी, अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आज पत्राद्वारे केली आहे.