दुष्काळग्रस्त लातूरच्या मांजरा नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना काढलेल्या सेल्फीमुळे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. हे सेल्फी सध्या सोशल मिडीयावर फिरत असून विरोधकांनी पंकजा यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.  राज्यात भीषण दुष्काळ असताना पंकजा मुंडे फोटोसेशन करण्याची असंवेदनशीलता कशी दाखवतात? असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. पंकजा यांनीही या टीकेला प्रत्युत्तर देताना जलसंधारणाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, ही दुष्काळाप्रतीची संवेदना नाही का? असा प्रतिसवाल विरोधकांना विचारला आहे. याशिवाय, पंकजा यांच्याकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. निव्वळ खमंग वार्ता पसरविण्यासाठी काहीजणांनी हा उद्योग केल्याचे पंकजा यांनी निवेदनात म्हटले आहे.

लातूरच्या दौऱ्यात अनेक वेळा पाणी टंचाईच्या बैठका घेतल्या. चर खोदून पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. अनेक ठिकाणी पाणी मिळण्यात अपयश आले. रविवारी लातूर दौऱ्यात साई बंधारा, मांजरा नदीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना ट्रेंच मध्ये पाणी बघून थोडसं समाधान वाटलं. मी आनंदाने  ( जे मी कधी एरवी करत नाही ) कामाचे फोटो व रेकार्डिंग स्वतः केले. वाळवंटात ओअॅसिस दिसावे एवढा आनंद मला पाणी पाहून झाला. हा फोटो कुठल्या समारंभाचा किंवा महोत्सवाचा प्रसंगी काढलेला नाही. काही उथळ लोकांनी याला वेगळे वळण दिले. इतपत लिहिले की, मी माझा मेक अप खराब झाल्याचे म्हटले. अरे अरे, मी याबद्दल काय बोलू? कळत नाही. इतक खोटं, इतक मेड अप करून एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जीव घेण्याचा हा प्रयत्न! त्याची शिक्षा काय? कोणाचं भलं करणार आहे, अशा खमंग वार्ता… दुष्काळग्रस्तांचं, शेतकऱ्यांचं की कोणाचं? हा फोटो ४५ डिग्री उन्हात माझ्या विभागाच्या कामाचं अवलोकन करताना काढला. त्यात exitement नव्हती, समाधान होतं ! खरं सात्विक जगासमोर यावं. चमचमीत खमंग रोज सहन होत नाही, बनवणा-यांना आणि पचवणाऱ्यांनाही, असे खडे बोल पंकजा यांनी निवेदनातून सुनावले आहेत.

 

Selfie with trench of said barrage Manjara .. one relief to latur .. pic.twitter.com/r49aEVxSSk


लातूर जिल्ह्यातील केसाई गावात भीषण दुष्काळामुळे मांजरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. याठिकाणी सध्या गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे रविवारी लातूरला गेल्या होत्या. त्यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु असताना पंकजांनी सेल्फी काढला. याशिवाय उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांसोबतही पंकजांनी सेल्फी काढला होता.