भारतातून नामशेष झालेले चित्ते जवळपास ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. आफ्रिकेच्या नामिबियातून आणलेले आठ चित्ते सध्या मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आहेत. या चित्त्यांना बघायला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. "चित्ते बघायला जाणार आणि मिळाल्यास त्यातील एक घेऊन येणार" असे मिश्किल वक्तव्य त्यांनी केले आहे. चित्त्यांवर जबरदस्त प्रेम असल्याचे पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी म्हटले आहे. Namibian Cheetahs : नामशेष झालेल्या चित्त्याचे तब्बल ७० वर्षांनंतर भारतात पुन्हा आगमन; पाहा नवा Video पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही या देशाच्या जंगलातील चित्ते आहोत, असे आठवले म्हणाले आहेत. राष्ट्रीय अभयारण्यातील एक चित्ता सहा वर्षांपूर्वी आठवले यांनी दत्तक घेतला आहे. जंगलांमध्ये चित्त्यांचे अस्तित्व आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे चित्ते पाहण्यासाठी प्राणी प्रेमींना काही महिने वाट पाहावी लागणार आहे. कुनो अभयारण्यातील या चित्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 'टास्क फोर्स' तयार करण्यात आल्याची माहिती रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात दिली. "चित्ते बघायला कधी मिळणार असा प्रश्न मला बरेच जण विचारतात. हे चित्ते नवीन वातावरणाशी कसे जुळवून घेतात यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. त्यांच्या निरीक्षणानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल", अशी माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. Cheetah Vs Leopard : चित्ता आणि बिबट्यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या पाच मादी आणि तीन नर चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात १७ सप्टेंबरला सोडण्यात आले आहेत. नामिबियातून विशेष विमानाने हे चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. १९५२ साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. दरम्यान, या चित्त्यांना बिश्नोई समाजाने विरोध दर्शवला आहे. काळवीटाला बिश्नोई समाजात महत्त्वाचे स्थान आहे. चित्त्यांना शिकारीसाठी सोडण्यात येत असलेल्या प्राण्यांमध्ये काळवीटांचादेखील समावेश आहे. ही कृती चुकीची असल्याचे बिश्नोई समाजाने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.