महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत १६ वर्षांच्या मुलीवर तब्बल ४०० लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. पीडितेने तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्यावर एका पोलिसाने देखील तिचे लैंगिक शोषण केले होते. ही पीडिता आता दोन महिन्यांची गरोदर आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, “तिच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी आठ महिन्यांपूर्वी तिचे लग्न लावून दिले. मात्र, पती आणि सासरच्या मंडळींनी तिला मारहाण आणि वाईट वागणूक दिली आणि छळ केला. त्यामुळे ती पळून गेली आणि वडिलांकडे राहायला आली. मात्र, वडिलांनी तिला परत न घेतल्याने ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बसस्थानकावर भीक मागायला गेली. यातूनच तिला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले.”

बालकल्याण समितीला दिलेल्या निवेदनात ती म्हणाली, “माझ्यावर अनेकांनी अत्याचार केले आहेत. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेकवेळा गेले, परंतु पोलिसांनी दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्याऐवजी, माझ्यावर एका पोलिसाने अत्याचार केला.”

दरम्यान, पीडितेने या आठवड्यात पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, बालविवाह प्रतिबंध कायदा, पॉस्को आणि भारतीय दंड संहितेच्या बलात्कार आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रविवारी बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामासामी यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे, असे एएनआयशी बोलताना सांगितले.