प्रबोध देशपांडे अकोला : आतापर्यंत आपण अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे किस्से ऐकले असतील. पण, वाशीम जिल्ह्यात मात्र १० जूनला एका अल्पवयीन मुलाच्या लग्नाचा घाट घालण्यात आला होता. १९ वर्षांच्या मुलासोबत १८ वर्षांच्या मुलीची लग्नगाठ बांधली जाणार होती. मुलगी वयस्क असली तरी मुलगा अल्पवयीन असल्याने हा विवाह रोखण्यात आला. त्यामुळे या अल्पवयीन नवरदेवाला वेशीवरूनच परतावे लागले. वाशीम तालुक्यातील धानोरा (खुर्द) येथे १० जून रोजी एका १९ वर्षीय अल्पवयीन मुलाचा बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती चाईल्ड लाईनला मिळाली. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी यांनी बाल संरक्षण कक्षाच्या चमूला तात्काळ घटनास्थळी जाऊन विवाह थांबवण्याचे निर्देश दिले. त्यावरुन तालुका संरक्षण अधिकारी बी.बी. धनगर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्रीय कार्यकर्ता रामा वाळले, चाईल्ड लाईनचे समुपदेशक अर्चना वानखेडे, अविनाश चौधरी, गोपीशंकर आरु, अविनाश सोनुने, शिवांगी गिरी, पोलीस अधिकारी ओंकार चव्हाण व गजानन चौधरी यांनी धानोरा (खुर्द) गाठले. तेथील ग्राम बाल समिती, सरपंच अशोक खडसे, ग्रामसेविका गंगासागर महाले, अंगणवाडी सेविका सुनीता आढाव, आशासेविका बेबी मापारी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष माधव मापारी, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी इंगोले यांच्यासोबत चर्चा करुन वधू व वराचे समुपदेशन केले. २१ वर्षे पूर्ण झाल्यावरच लग्न करणार असल्याचे हमीपत्र नवरदेवाकडून लिहून घेण्यात आले.