संगमनेर : खरीप हंगामासाठी सरकारने संगमनेर तालुक्यासाठी आवश्यक प्रमाणावर युरिया खत उपलब्ध करून दिले आहे. असे असतानाही काही ठिकाणी युरिया मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील शेतकरी युरिया खतापासून वंचित राहणार नाही याची दक्षता कृषी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले.
संगमनेर तालुक्यात युरिया खताचा पुरेसा पुरवठा असतानाही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, तालुक्यात ४११ मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाले होते. त्यातील २०५ मेट्रिक टन खताचे वितरण पूर्ण झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रे आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना खत वितरित करण्यात आलेले आहे.
सर्व कृषी सेवा केंद्रे, सहकारी संस्था यांचा समन्वय साधून युरियाचा साठा निश्चित करावा. शेतकऱ्यांना तांत्रिक कारणाने युरिया खत मिळण्यास काही अडचणी येत असेल तर त्यावर तत्काळ उपाययोजना करावी. कृषी सेवा केंद्र चालक, अगर सहकारी संस्था युरिया असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
अफवांवर विश्वास ठेवू नये
संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी युरिया टंचाई असल्याच्या विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. मागणीनुसार पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कुठे अडवणूक होत असेल तर आपल्या संपर्क कार्यालयात कळवावे. त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाईल. सर्वांना आवश्यक तेवढे खत उपलब्ध करून दिले जाईल. –आमदार अमोल खताळ