राज्यभरातील शिक्षकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी आज पत्रकारपरिषद घेत, पुन्हा एकदा आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली. याशिवाय ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिना निमित्त गावात राहत असलेल्या शिक्षकांचा मी स्वत: सन्मान करणार आहे. याशिवाय, सरपंच, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य किंवा पालकांनी देखील शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानावेत, असे आवाहनही केले आहे. मात्र जर शिक्षक गावात राहत नसतील तर ही बाब मी शिक्षण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून याबाबत शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचेही आमदार बंब यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजेत – भाजपा आमदार प्रशांत बंब यांचं विधान!

पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार बंब म्हणाले, “कोणालाही वाटतं त्याची मूलं चांगल्याप्रकारे शिकले पाहिजेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. याशिवाय यामागे विविध कारणं देखील असतात. इतकच नाही तर शिक्षकांना देखील वाटतं की त्यांची मुलं चांगली शिकावी. आपल्याला आश्चर्य वाटले सरकारने प्रचंड व्यवस्था तयार केलेल्या आहेत. मी जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकलेलो आहे, त्यावेळी इतकीच कामं होती, इतक्याच सगळ्या बाबी होत्या. उलट डिजीटल युगात आता सगळ्या बाबींचे संगणीकरण झाल्याने त्यांना कमी कामे करावी लागतात. या सगळ्या व्यवस्थेतून आपण सगळेजण निघालेलो असताना, आता हे काय सांगतात की आम्हाला शिक्षक कमी आहेत. परंतु आपण जर पटसंख्या बघितली, राज्यातील शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर एका वर्गात आपण किती विद्यार्थी ठेवावे याचा जर विचार केल्यास शिक्षकांची संख्या जास्त निघेल.”

…त्यामुळे आपलं राज्य हे दिवसेंदिवस डबघाईला –

तसेच, “एवढंच नाही जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना सरकारने एवढ्या व्यवस्था दिलेल्या असतानाही, शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देत नसल्याने त्यांना स्वत:ला त्यांची मूलं जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकण्याची हिंमत होत नाही. त्यांना आपल्या मुलांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरात शिकवायचं असतं म्हणून ते त्यांचं घर त्या ठिकाणी करतात. अशा शिक्षकांच्या आणि शिक्षकांना पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या व्यवस्थेमुळे आपलं राज्य हे दिवसेंदिवस डबघाईला जात आहे. माझ्या पूर्ण सर्वेमध्ये किंवा मी केलेल्या चौकशीत, मागील तीन वर्षांपासून मी यावर काम करतोय, ७० टक्के शिक्षकांच्या स्वत:च्या प्लॉटिंग्स आहेत. गणवेशांची कामे देखील त्यांची स्वत:चीच आहेत. एवढंच नाही पती-पत्नी एकाच ठिकाणी राहून दुप्पट भाडं उचलत आहेत. असे एक ना अनेक असे प्रकार शिक्षकांकडून अजिबात अपेक्षित नसताना केले जात आहेत. दुसरीकडे शिक्षक काय सांगता की आम्हाला गावात सुखसोयी नाहीत. मी त्यांना सांगू इच्छितो की सुखसोयींसाठी तुमची नोकरी नाही.” असंही बंब म्हणाले.

प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन त्याचं पुजन करा –

याचबरोबर “येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आहे, त्या दिवशी सुट्टी असते. या दिवशी सकाळी आठवाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजपेर्यंत सरपंच, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा पालक कुणीही त्या दिवशी प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन त्याचं पुजन करावं. ते गावात राहतात त्याबद्दल आभार व्यक्त करूयात. नियमानुसार शिक्षकाने गावात राहणं क्रमप्राप्त आहे आणि त्याला जर हे शिक्षक दाद देत असतील तर ही निश्चितच चांगली बाब आहे. परंतु जर हे शिक्षक गावात राहत नसल्याचे निदर्शनास आले तर त्याबाबत शिक्षण अधिकऱ्यास जाब विचारला जाईल. याशिवाय ही बाब मी शिक्षणमंत्र्यांच्या आणि मुख्यमंक्षत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या देखील निदर्शनास आणून देईल.” असं देखील आमदार बंब यांनी जाहीर केलं.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांवर आरोप –

तर, “शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले बहुतांश आमदार हे शिक्षकांच्या चुकांना, एवढंच नाही तर गुन्हेगारी कृत्यांवर पांघरून घालत आहेत. म्हणून समाजाच्या पिढ्या बरबाद व्हायला माझ्या मित्रांचा सहभाग नसावा.” असा आरोप त्यांनी यावेळी केला.