Rohit Pawar On Praful Patel : अजित पवारांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर एका महिन्याने एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात एएआयबीचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला. एएआयबीच्या प्राथमिक अहवालात विविध निष्कर्ष मांडण्यात आलेले आहेत. मात्र, एएआयबीने सादर केलेला प्राथमिक चौकशी अहवाल दिशाहीन असून केवळ रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

अजित पवार यांचा अपघात की घातपात? याबाबत रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित करत मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन अनेक सवाल उपस्थित केले आहेत. व्हीएसआर कंपनीवरही रोहित पवारांनी अनेक आरोप केले आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे देशातील विविध नेत्यांच्या भेटी घेऊन अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात माहिती देत असून अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी हा विषय संसदेत मांडण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, यातच आज रोहित पवारांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या एका पोस्टची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ‘प्रफुल पटेलजी VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही गेला होतात का?’, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. तसेच ‘जर तुम्ही त्या लग्नाला गेला असाल तर तेथे आणखी कोण नेते होते? याबाबत पत्रकार परिषद घेऊन उद्या स्पष्टीकरण द्या’, असं आव्हान रोहित पवार यांनी प्रफुल पटेल यांना दिलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

“Mr.प्रफुल पटेलजी (माजी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला/घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते? हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात? हे महाराष्ट्राला दाखवून द्या, उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar On Praful Patel
रोहित पवार यांची पोस्ट काय आहे?

AAIB च्या प्राथमिक अहवालावर सुनील तटकरेंनी काय म्हटलं?

एएआयबीच्या प्राथमिक चौकशी अहवालाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही नुकतंच मोठं वक्तव्य केलं. सुनील तटकरे म्हणाले, “एएआयबीच्या प्राथमिक अहवालाबाबत मी एवढं म्हटलं आहे की एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर आमचं कोणाचंही समाधान नाही. त्या प्राथमिक अहवालात त्रुटी आहेत. या अपघाताबाबत ज्या-ज्या काही शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यासहित या घटनेचा तपास परिपूर्ण पद्धतीने व्हावा आणि लवकरात लवकर तो तपास राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर यावा. ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सर्व सदस्याची भूमिका आहे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं.