महाराष्टा नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ मे रोजी झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेसाठी अटी व शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र सभेदरम्यान या अटींचे पालन झाले नाही आणि नियम देखील मोडले गेल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार राज ठाकरे, राजीव जेवळीकर व इतर आयोजकांविरोधात गुरन -१२७/२०२२ कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखळ करण्यात आल आहे. याबाबत अधिक तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे तपास करत आहेत.

“राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार”; पोलीस महासंचालकांची महत्वाची माहिती

राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत बोलताना मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मे रोजचा अल्टिमेटम दिलेला आहे. भोंग काढले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता उद्या मनसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.