राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने नवी प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार तीन, दोन आणि एकसदस्यीय व्यवस्था असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून आक्षेप घेतला जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर तोंडसुख घेतलं आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नव्या प्रभाग रचनेवर टीका केली. “अशी कोणतीही पद्धत देशात कुठेही अस्तित्वात नसताना महाराष्ट्रात हे कुठून आणि का सुरू झालं, याचं एकमेक कारण सत्ता काबीज करणं आहे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“या विषयी ५ वर्षांपूर्वीही मी बोललो होतो. २०१२मध्ये जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं, तोपर्यंत एकाच उमेदवाराची व्यवस्था होती. तेव्हा त्यांनी २ उमेदवारांच्या प्रभागाची रचना केली. त्यानंतर भाजपानं ४ उमदवारांचा प्रभाग केला. आता हे सरकार आल्यावर त्यांनी आधी एक प्रभागाची रचना आणली. निवडणूक आयोगानंही एकाच उमेदवाराचा प्रभाग करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काल यांनी पुन्हा ३ उमेदवारांचे प्रभाग आणले”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“तीन आमदार किंवा खासदारांचा एक प्रभाग करणार का?”

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार का? असा उलट सवाल देखील राज ठाकरेंनी यावेळी केला. “मुळात अशी कोणतीही पद्धत देशात कुठेही नाही. सगळीकडे खासदारकी, आमदारकी, पालिका, ग्रामपंचायतीपर्यंत एकच उमेदवार हीच पद्धत आहे. महाराष्ट्रात हे कुठून सुरू झालं आणि का याचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्यातून आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करणे आणि पैसा ओतून निवडणूक जिंकणे. पण याचा त्रास लोकांना का? एका उमेदवाराला मत देण्याऐवजी तीन उमेदवारांना लोकांनी का मत द्यायचं? जनतेला गृहीत धरायचं, हव्या त्या पद्धतीने प्रभाग करायचे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी. महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? हा कसला खेळ चालू आहे? उद्या तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का?” असं ते म्हणाले.

“जनतेनं कोर्टात जायला हवं”

यासंदर्भात राज्य सरकारवर टीका करतानाच राज ठाकरेंनी नागरिकांना देखील आवाहन केलं आहे. “माझी जनतेला विनंती आहे की लोकांनी कोर्टात, निवडणूक आयोगाकडे जायला हवं. कोणताही नगरसेवक दुसऱ्याला काम करू देत नाही. एकानं प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो. उद्या लोकांना नगरसेवकाला भेटायचं असेल, तर त्यांनी कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? निवडणुकीची थट्टा करून ठेवलीये यांनी आणि जनता त्यावर काही बोलत नाही. आम्ही न्यायालयात गेलो तर त्याला राजकीय वास येतो”, असं राज ठाकरे म्हणाले.

निवडणुका मॅनेज होतात…

दरम्यान, अशा प्रकारे प्रभागरचना वारंवार बदलून निवडणुका मॅनेज होत असतात, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. “यातून निवडणुका मॅनेज होतात. आधी एकचा प्रभाग पुन्हा चारचा का केला. चारचा होता, तो परत तीनचा का केला? गेल्या १० वर्षांतला हा खेळ सुरू आहे आणि आपण उघड डोळ्यांनी बघत राहायचं?”, असं देखील राज ठाकरे म्हणाले.