Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत शिवाजी पार्कवर पार पडलेल्या पाडवा मेळाव्यातून सत्ताधारी आणि विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही परखड शब्दांत टीकास्र सोडलं. हिंदुत्वाबाबतही राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. त्यासाठी त्यांनी थेट जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवादाबाबत मांडलेल्या भूमिकेचाही संदर्भ दिला. “मला धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
“मला लोकांनी विचारलं, तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून तुम्ही कुणाला बघता? मी म्हटलं मला धर्मांध हिंदू नकोय. मला धर्माभिमानी हिंदू हवाय. जो दुसऱ्याच्या धर्माचाही मान राखेल. मला माणसं हवी आहेत. मुस्लीम धर्मातलीही माणसं मला हवी आहेत. पण ती माणसं जावेद अख्तरांसारखी असायला हवीत”, असं राज ठाकरे म्हणाले.
“या देशातल्या कुठल्याही नागरिकानं आजपर्यंत पाकिस्तानात जाऊन…”
“या देशातल्या कोणत्याही नागरिकानं पाकिस्तानमध्ये जाऊन आजपर्यंत खडे बोल सुनावले नाहीयेत. द्वेषानं बघण्यासारखं समोर काहीही नसतं. पण जिथे कुरापती काढत असतील, त्यांना त्याच पद्धतीचं उत्तर द्यायला हवं”, असं म्हणत राज ठाकरेंनी जावेद अख्तर यांच्या त्या कृतीचं कौतुक केलं.
“मला अपेक्षित असलेला मुसलमान कसा असला पाहिजे? पाकिस्तानला सुनावणारा, तशी हिंमत असणारा मुसलमान मला पाहिजे. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना सुनावलं आहे. तिथे त्यांच्या लोकांसमोर जाऊन त्यांना सांगायचं की आमच्या शहरावर झालेला हल्ला आम्ही विसरणार नाही. अशी माणसं मला अपेक्षित आहेत”, असं राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.
“मुख्यमंत्री शिंदेंना दोनपैकी एक निर्णय घ्यावाच लागेल”
दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरंनी एकनाथ शिंदे सरकारला मशिदींवरच्या भोंग्यांवरून इशारा दिला आहे. “नवीन सरकार आल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं. त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. मुख्यमंत्रीजी, तुमच्याकडे शिवसेना नाव आलंय. धनुष्यबाण आलंय. गेल्या गुढी पाडव्याला आम्ही सांगितलं होतं की मशिदीवरचे भोंगे बंद करा. तेव्हा मनसेच्या १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. ते आधी मागे घ्या. दुसरं, एक तर तुम्ही सांगा की लाऊड स्पीकर बंद करा अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही लाऊडस्पीकर बंद करतो. दोनपैकी एक निर्णय एकनाथ शिंदे सरकारला घ्यावाच लागेल. गेल्या काही दिवसांत पुन्हा या मशिदींवरचे भोंगे वाजायला लागले आहेत. मी विषय सोडणार नाही, मी विषय सोडलेला नाही. मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहे”, असा इशारा त्यांनी दिला.