राज ठाकरेंचं पाडवा मेळाव्यातील भाषण आणि नितीन गडकरींनी घेतलेली राज ठाकरेंची भेट यावरून आगामी काळात भाजपा मनसेची युती होणार, अशी चर्चा सुरू आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय. “नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या घरी दिलेली भेट ही वैयक्तिक होती, राजकीय नाही. नितीन गडकरी राज ठाकरेंचं नवीन घर बघायला आले होते, त्यावरून अशी चर्चा करणं योग्य नाही,” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

“शिवसेना ही राष्ट्रवादीची…”; आदित्य ठाकरेंनी भाजपाची ‘सी’ टीम म्हटल्यानंतर मनसेचं प्रत्युत्तर

“सध्या तरी भाजपा मनसे युतीचा कोणता प्रस्ताव नाही, भविष्यात काय होईल माहित नाही. परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेनं युती तोडली आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढले, राष्ट्रवादीने भाजपासोबत दोन दिवसांचं सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या मांडीवर जाऊन बसले. एवढा लोकसाक्षीने व्यभिचार करून जर यांना प्रश्न विचारले तर यांना राग येतो आणि आमच्या नुसत्या अफवा जरी उडल्या तरी यांना मिरच्या झोंबतात,” अशी खरमरीत टीका संदीप देशपांडेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर केली.

आगामी काळात भाजपासोबत युतीबद्दल विचारलं असता संदीप देशपांडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, “राज ठाकरे आणि मनसे आमचे विचार मांडत असतात. जे विचार महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचे आहेत, ते राज ठाकरे मांडतात. यामध्ये कोणाची कॉपी करण्याचा किंवा कोणासोबत जाण्याचा विषय नाही. भविष्यात युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील. तो निर्णय महाराष्ट्र राज्य, मनसे आणि हिंदुत्वाच्या हिताचा असेल,” असं संदीप देशपांडेंनी सांगितलं.