Raj Thackeray MNS Padwa Melava: “असं कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असलेलं सरकार…”, राज ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “नवीन मुख्यमंत्री…!”
MNS Gudi Padwa Rally Updates: राज ठाकरे म्हणतात, “मला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की महाराज सुरतहून लुट करून इथे आले. महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच!”
राज ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech Mumbai: मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं भाषण हा प्रमुख आकर्षणाचा आणि अवघ्या राज्याच्या राजकीय वर्तुळातला चर्चेचा विषय असतो. यंदा मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेलं भाषणही तसाच चर्चेचा विषय ठरलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी मनसे आणि शिंदे गटाच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तशी कोणतीही घोषणा राज ठाकरेंनी केली नसून उलट एकनाथ शिंदेंनाच खोचक सल्ला दिला आहे. तसेच, शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असल्याबाबतही राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
“कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रानं पाहिलंय आणि कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्र बघतोय. नवीन उद्योग दिसत नाहीयेत. बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी सरकारकडे बघतायत आणि सरकार कोर्टाकडे बघतंय. आमचं काय होणार? आमचा निर्णय कधी लागतोय? असं कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
“आत्ताची राजकीय परिस्थिती पाहाता सगळ्यांनी एकदा ठरवा आणि अत्ताच विधानसभा निवडणुका लावा. जो काय सोक्षमोक्ष व्हायचा तो एकदा होऊनच जाऊन दे. जो काही चिखल केलाय, तो नाही नागरिकांनी तुमच्या तोंडात घातला तर बघा. नवीन नवीन मुख्यमंत्री आहेत, समजू शकतो आपण. करा काम नीट”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही इशारा दिला आहे.
“मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो, उद्धव ठाकरेंच्या मागून…”
“१९ जूनला आपल्याला कळलं की एकनाथ शिंदे आमदार घेऊन गेले सुरतला. मला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की महाराज सुरतहून लुट करून इथे आले. महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच. मग गुवाहाटी, गोवा करत करत आता ते मुख्यमंत्री म्हणून बसले.एकनाथ शिंदेंना मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसले आहात, राज्यासाठी काम करा. उद्धव ठाकरे जिथे सभा घेतायत, त्यांच्या मागून सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीला घेतली, यांनी वरळीला घेतली. त्यांनी खेडला घेतली, यांनी खेडला घेतली. गुंतवून ठेवतील. महाराष्ट्राचं काय? एवढे महाराष्ट्रात प्रश्न प्रलंबित आहेत”, असा सल्लाही राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.