पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळालं असून त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातून अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील शपथविधी पार पडल्यानंतर नारायण राणे यांना फोन केला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पदभार स्वीकारताच नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले….

“मी नारायण राणेंना फोन केला होता, मात्र त्यांचा आणि त्यांच्या मुलांचादेखील फोन बंद होता. त्यामुळे मी एक दोन दिवसात फोन करेन,” असं राज ठाकरेंनी यावेळी सागितलं.

उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही

नारायण राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? असं विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, “नाही त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचं मन इतकं मोठं नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो”. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली होती.

कट्टर शिवसैनिक ते मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री; नारायण राणेंचा संघर्षमय प्रवास

संजय राऊतांची नारायण राणेंवर खोचक प्रतिक्रिया

“नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत,” असं संजय राऊत म्हणाले होते.

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवेसनेकडून पहिली प्रतिक्रिया

“शिवसेनेला कोकणात फटका बसण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं असेल तर तो मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रीपद दिलं जातं. शिवसेना, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहे त्यांना फटका देण्यासाठी मंत्रीपद दिले जात असतील तर हे घटनाविरोधी आहे. असं असेल तर त्यांना कळवायला सांगा की, त्यांना देशाची सेवा करण्याऐवजी या कामासाठी मंत्रीपद दिलं आहे. पण असं वाटत असेल ते चुकीचं आहे. मंत्रीपद राज्याचं आणि देशाचं असतं जे विकास आणि लोकांची कामं कऱण्यासाठी असतात,” असं संजय राऊत म्हणाले होते.