सावंतवाडी: केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून आज जिल्हा भरात विविध ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रील घेण्यात आले.

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने सादर करण्यात आलेले विविध प्रात्यक्षिके देखील सर्वांनाच उपयोगी पडणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले.

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉक ड्रिलच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवि पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शारदा पोवार, श्रीमती आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत, जिल्हा कोषागार अधिकारी श्री मेश्राम आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय संरक्षण दल, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय करु नये याबाबतचे प्रात्यक्षिके देखील दाखविण्यात आले.

दुपारी ४ वाजता सावंतवाडी ,मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, तिलारी प्रकल्प तसेच ग्रामीण भागात देखील मॉक ड्रिल पार पडले.