परभणी : वक्फ कायद्यानुसार देशातील सर्व संपत्ती ही अल्ला म्हणजेच ईश्वराच्या मालकीची असतानाही या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आता ही सर्व जमीन बळकावली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा काळा कायदा मी फाडून टाकतो अशी जाहीर भूमिका मी संसदेत घेतली. हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा असे प्रतिपादन एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी येथे केले. मुंबईस्थित असलेल्या भारतातल्या सर्वात धनाढ्य व्यक्तीने वक्फच्या जागेवर आपला महाल बांधला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. आपल्या मित्राचा फायदा करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा आणला आहे अशी टीकाही यावेळी ओवेसी यांनी मुकेश अंबानी यांच्या अनुषंगाने केली.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने रविवारी (दि.27) वक्फ बिलाच्या विरोधात एकदिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात खा.ओवैसी यांची येथे रात्री जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड अध्यक्ष मोहम्मद खलील सैफला रहमानी आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले, संसदेमध्ये मंजूर झालेले वक्फ बिल हे मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे. देशामध्ये अन्य धर्मीय जे आहेत त्यांच्या देवस्थानामध्ये ट्रस्टी म्हणून त्याच धर्माचे लोक आहेत अन्य धर्मीयांना त्यात स्थान नसते. पण या वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर मुस्लिमांच्या धार्मिक ट्रस्टमध्ये अन्य धर्मीयांचा समावेश केला जाणार आहे. प्रत्येक धर्मियांना आपल्या धर्मानुसार जगण्याचा हक्क या देशाच्या राज्यघटनेने दिला आहे, घटनेत तशी तरतूदच करण्यात आलेली आहे. पण केंद्र सरकारने मात्र राज्यघटनेच्या विरोधात जाऊन हे बिल पास करून घेतले आहे. त्यामुळेच आता हे बिल रद्द करावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे असे ओवेसी म्हणाले. अन्य धर्मीयांना एक न्याय आणि मुस्लिमांना एक न्याय कसा चालेल असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
ओवेसी यांनी वक्फ विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितेशकुमार, चंद्राबाबू नायडू, यांच्यावर जोरदार टीका केली. नुकतीच अजित पवार यांची परभणीत सभा झालेली असल्याने सर्वत्र रस्त्यावर त्यांचे बॅनर होते त्याचा उल्लेख करत ओवेसी यांनी अजित पवारांनाही आपल्या भाषणात लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात उघड वक्तव्य केली. आपल्या चुलत्याच्या विरोधात जाहीर भूमिका घेणारे अजित पवार वक्फ विधेयकावर काहीही बोलत नाहीत. या विषयावर अजित पवार तुम्ही गप्प का असा प्रश्न खासदार ओवेसी यांनी उपस्थित केला. हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे. मस्जिद, दर्गाह, कब्रस्तान, ईदगाह अशा सर्व जमीन बळकावण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे असेही ओवेसी यावेळी म्हणाले.