सांगली : यंदाच्या हंगामात गाळप करीत असलेल्या राज्यातील १८७ कारखान्यांपैकी ६७ कारखान्यांनी कराराप्रमाणे एफआरपीनुसार ऊस उत्पादकांचे पैसे निर्धारित वेळेत अदा केले असून यामध्ये सांगली जिल्हयातील सात साखर कारखान्यांचा समावेश आहे. साखर आयुक्त कार्यालयाने १५ जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या नावे वर्ग करणाऱ्या कारखान्यांची वर्गवारी करून हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल रंगात विभागणी केली आहे. यंदाच्या हंगामात राज्यात सहकारी व खासगी १८७ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून यापैकी ६७ कारखान्यांनी एफआरपी अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम उत्पादकांना दिली आहे. यामध्ये सांगली जिल्हयातील निनाई, जत, सोनहिरा, विश्वास, क्रांती, आरग, उदगिरी या कारखान्याचा समावेश आहे. दुसऱ्या श्रेणीमध्ये ३१ कारखाने असून या कारखान्यांनी उसाची देयके ८० टक्क्यावर अदा केली आहेत, तर ६० टक्क्यावर देयके अदा केलेल्या तिसऱ्या श्रेणीमध्ये ३४ कारखाने आहेत. तर धोकादायक श्रेणीमध्ये ५५ कारखाने आहेत. उस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांची आर्थिक स्थिती ज्ञात व्हावी यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती समाज माध्यमातून प्रसारित केली आहे.