अमरावती शहरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दगडफेक, जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भाजपाने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. दरम्यान, प्रशासनाने ४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. अफवा पसरवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आली. 

अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर खासदार नवनीत राणा यांनी तिथल्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांची राज्यसरकारवर टीका केली आहे. टीव्ही नाईन मराठी सोबत बोलतांना अमरावतीतील हिंसाचार यंत्रणेचे अपयश असल्याचे राणा म्हणाल्या. तसेच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. 

नवनीत राणा म्हणाल्या, “आमच्या अमरावती जिल्ह्यात असं कधीही घडल नाही. पहिल्यांदा अशी घटना घडली. त्यामुळे मला खूप दु:ख वाटत आहे. या हिंसाचारात जे जखमी झाले तसेच ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने भरपाई द्यावी. यामध्ये काही राजकीय लोक आपले हात धूऊन घेत आहेत.” 

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या तोंडावार इतर पक्ष हे घडवून आणतात, असा आरोप केला आहे. यावर बोलतांना नवनीत राणा म्हणाल्या, देशातील बाकी राज्याचं आमच्या जिल्ह्याशी काय घेण-देण आहे. ही घटना हाताळण्यात तुम्ही अपयशी ठरले आहात. तसेच राणा यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. “संजय राऊत अमरावतीबद्दल बोलत आहेत. ते कोणत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. माझ्या आमरावतीच्या लोकांबद्दल तुम्ही कशी प्रतिक्रिया देत आहात?, आम्ही आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचं तम्हाला निमंत्रण दिल नाही. तुम्ही तुमचं काम करा जे तुम्हाला बरोबर येत नाही, ते आधी शिकून घ्या.”, असा खोचक टोला नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. 

नेमक काय घडलं?

अमरावती शहराच्या पश्चिमेकडील नमुना, सराफा बाजार, सक्करसाथ या भागांत दोन गट समारोसमोर आल्याने काही काळ बिकट स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

त्रिपुरा येथील घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी काही समाजकंटकांनी दुकानांवर दगडफेक केली. तसेच काहींना मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ भाजपाने शनिवारी ‘अमरावती बंद’चे आवाहन केले होते. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर भागांतून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजकमल चौकात जमले होते. तेथे कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. काही वेळानंतर भाजपाचे आंदोलक कार्यकर्ते ऑटोगल्ली, अंबापेठ परिसरात शिरले. घोषणाबाजी करीत त्यांनी बंद दुकानांवर दगडफेक केली. अंबापेठ येथील एका रुग्णालयावरही दगडफेक करण्यात आली. आंदोलक नमुना गल्ली परिसरात शिरल्यानंतर त्यांना दुसऱ्या गटाकडून प्रतिकार करण्यात आला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी या परिसरात काही दुकाने, टपऱ्या पेटवून दिल्या. वाहनांना आग लावली. 

दुसरीकडे, इतवारा बाजार परिसरात मोठा जमाव एकत्र आला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर के ला. अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. या भागातही दोन गट एकमेकांसमोर आले होते; पण पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली. याच काळात मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्याने गल्ल्या-गल्ल्यांमधून लोक बाहेर यायला लागले. शहरातील पश्चिमेकडील भागात तीव्र संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. दंगलखोरांनी नमुना, अंबापेठ, राजकमल चौक, सराफा बाजार, धान्य बाजार, सक्करसाथ, हर्षराज कॉलनी, हमालपुरा या भागांत दगडफेक केली. दगडफेकीत पाच पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.