कराड विमानतळावर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याने जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग यांच्याकडे केली आहे. खासदार पाटील हे दिल्लीमध्ये लोकसभेच्या हिवाळी अधिवेशासाठी उपस्थित आहेत. या दरम्यान त्यांनी कराड विमानतळ संदर्भातील प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व व्ही.के.सिंग यांना पत्र लिहले आहे. कराड शहराच्या बाहेर सुमारे चार किमी अंतरावर हे छोटे विमानतळ आहे. ते हेलिकॉप्टर आणि लहान खाजगी विमानांसाठी क्वचित वापरले जाते. तिथे वर्षभरात सुमारे १५ ते २० विमाने येत असतात. मात्र, विमानतळ आजूबाजूच्या २० किमी परिसरात बांधकाम आणि वृक्षारोपणावर निर्बंध लादले गेले आहेत. नुकतेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सातारा जिल्हाधिकारी यांना याबाबत दिलेल्या निर्देश पत्रानुसार कराड विमानतळापासून २० किमीच्या परिघात कोणतेही बांधकाम किंवा वृक्षारोपण करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. कराड आणि शेजारील मलकापूर शहराच्या पालीका अधिकाऱ्यांना तसे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. बांधकामे आणि वृक्षारोपणाची उंची आणि प्रकार याबाबत स्पष्ट अटींशिवाय या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, असे प्रमाणपत्र मिळवण्याची नेमकी प्रक्रियाही स्पष्ट केलेली नाही. परिणामी २० किमी त्रिज्येच्या मोठ्या क्षेत्रातील सर्व बांधकाम आणि विकास प्रक्रिया ठप्प झाली आहे. कराडची क्रेडाई संस्था तसेच प्रकल्पबाधित नागरिक या अन्यायकारक आणि अस्पष्ट निर्बंधांबद्दल तक्रारी करत आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. कराड विमानतळ हे छोटेसे विनावापर असलेले विमानतळ आहे. त्याचा वापर फार कमी वेळा होत असल्याने याची दखल घेऊन एकतर लादलेली निर्बंध उठवण्याची किंवा किमान कोणत्या प्रकारची आणि कोणत्या उंचीपेक्षा जास्त बांधकामांना नाहरकत परवानगी आवश्यक आहे. यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची गरज आहे. दरम्यान संपूर्ण परिसराचा विकास ठप्प होऊन मनमानी पद्धतीने लादलेले निर्बंध व त्याच्या अस्पष्ट स्वरूपाबाबत परिसरात तीव्र नाराजी आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालकांकडेही दाद मागितली आहे. मात्र तरीदेखील आपण याची दखल घेऊन तातडीने लक्ष घालावे. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करून याविषयी स्पष्टतेसह नागरिकांना योग्य दिलासा देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी संबंधित मंत्र्यांकडे केली आहे.