महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी स्वप्नील लोणकर नावाच्या या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर शनिवारी रात्री हे प्रकरण उजेडात आलं. या घटनेमुळे आख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. या प्रकरणावरून एमपीएससीचे इतर परीक्षार्थी आणि विरोधकांनीही राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून एमपीएससीवर टीका केल्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या प्रकरणावरून थेट राज्य सरकारवरच टीकास्त्र सोडलं आहे. या आत्महत्येसाठी प्रविण दरेकरांनी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे.

“आता तरी राज्य सरकारने…!”

“नैराश्यातून समाजातील विविध व्यथित घटक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. “या युवकाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे”, असा आरोपही दरेकर यांनी केला.

Swapnil Lonkar Suicide : “मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षांचा मुलगा मंत्री होतो; पण आमच्या नियुक्त्यांचं काय?”

“अखेर नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले”

दरम्यान, लोकसेवा आयोगाने नियुक्ती न दिल्यामुळेच स्वप्नील लोणकरने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. “पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षे झाले तरी त्या युवकाला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं”, अशी टिका दरेकर यांनी केली. “करोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा, प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे आणि आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन परीक्षा व नोकरीसाठी तात्काळ उपाय योजना व अंमलबजावणी करावी”, अशी मागणी दरेकर यांनी केली.

स्वप्निलने MPSC ला का म्हटलं मायाजाल?; वाचा आत्महत्येपूर्वी लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र

मन हेलावून टाकणारं स्वप्निलचं पत्र…

“MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता!” असं स्वप्निल लोणकरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.