मुबंईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. फडणवीस-मलिक नव्या वादाने अमली पदार्थ कारावाई प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला असून फडणवीसांनीही त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतली, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांचा उद्या स्फोट करणार आहे, असा इशारा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीट केलं असून आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.

नवाब मलिक यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. “उनकी नींद खो गई है,अब चैन खोने का वक़्त आ गया है. मिलते है आज सुबह १० बजे”, असं नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जमीन व्यवहाराबाबतचे केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. जमिनीचा जो काही व्यवहार केला आहे, त्याची सर्व कागदपत्रे उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध आहेत. जो काही व्यवहार झाला, त्याचे मुद्रांक शुल्क भरलेले आहे. फडणवीस खोटे बोलत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

फडणवीसांनी जे आरोप केले आहेत, त्याची सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करा, मी कुठल्याही चौकशीला तयार आहे, असे मलिक म्हणाले. सनातन या संस्थेने कोकणातील दाऊदचे घर विकत घेतले, मग सनातनचे व दाऊदचे संबंध आहेत, असे समजायचे का, असा सवाल त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डचा ) आपले संबंध असल्याचा आरोप करून वेगळा खेळ सुरू केला आहे. परंतु गुन्हेगारी जगताच्या माध्यमातून मुंबई शहराला ‘ओलीस’ कसे ठेवले, एक व्यक्ती परदेशात बसून खंडणी कुणासाठी वसूल करत होती, तो अधिकारी कुणाचा खास होता, याचा पर्दाफाश उद्या करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

‘वानखेडेंच्या बेकायदेशीर कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी याचिका ’

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बेकायदा कृत्यांवर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न म्हणून त्यांच्या वडिलांनी आपल्याविरुद्ध मानहानीची याचिका के ल्याचा दावा नवाब मलिक यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला. आपण आतापर्यंत वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत केलेले कोणतेही वक्तव्य खोटे वा चुकीचे नसल्याचे आणि त्याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही मलिक यांनी के ला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी न्यायालयाने मलिक यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश देत प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली आहे. त्यानुसार मलिक यांनी अ‍ॅड्. अतुल दामले यांच्यामार्फत मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले.