अहिल्यानगर: एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमनाथ घार्गे यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची नाराजी भोवल्याचे मानले जाते.

जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांची २३ मे २०२५ रोजी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. वर्षभराचा कालावधी त्यांच्यासाठी संमिश्र राहिला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात आर्थिक घोटाळ्यांच्या गुन्ह्यांचा तपास तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. त्यापूर्वी सिस्पे व इतर कंपन्यांचे आर्थिक घोटाळे गाजले. या गुन्ह्यांचा तपासही संथ गतीने झाला. घार्गे यांच्या कालावधीत सर्वात प्रमुख घटना घडली, ती जप्त केलेल्या अमली पदार्थांना पोलीस मुख्यालयातून पाय फुटल्याची घटना. या घटनेने जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला होता. घार्गे यांची मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले मुम्मका सुदर्शन हे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. ते मूळचे आंध्र प्रदेशातील व २०१६ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. तत्पूर्वी त्यांनी प्राप्तीकर निरीक्षक म्हणूनही काम पाहिलेले आहे. भारतीय पोलीस प्रशासन सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी परभणी येथे अतिरिक्त अधीक्षक, नागपूर येथे उपायुक्त (गुन्हे) या पदावर काम केले आहे. धाडसी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

राज्य सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील व राज्य पोलीस सेवेतील २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज, गुरुवारी केल्या आहेत. त्यामध्ये सोमनाथ घार्गे व मुम्मका सुदर्शन यांचा समावेश आहे.