लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून संतप्त झालेल्या जमावाने नवऱ्या मुलाच्या भावाची हत्या केल्याची घटना पेझारी येथे घडली आहे. या प्रकरणी ९ जणांविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूर ठाणे येथे मुलाचे अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील मुलीशी लग्न ठरले होते. त्यांच्या सारखपुडाही झाला होता. मात्र साखरपुड्याच्या कार्यक्रमा दरम्यान मुलीकडच्या मंडळीनी मुलावर काही टिप्पणी केली होती. त्यामुळे मुलाकडील मंडळींनी माफी मागा अन्यथा लग्न मोडतो अशी धमकी दिली होती. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मुलाकडील मंडळींवर हल्ला चढवला. यात मुलाचा भाऊ विठू तुपट हा गंभीर जखमी झाला. त्याला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड या प्रकरणाचा तपास करत आहेत. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पाच आरोपींना अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.