सांगली : जत तालुक्यात दरीकोणूर येथे एका महिलेसह मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दरीकोणूर गावी उमदी रस्त्यावर असलेल्या बेळुंखे वस्तीवर प्रियांका बिरूदेव बेळुंखे (वय ३२) आणि मोहिनी बिरूदेव बेळुंखे (वय १४) या दोघींचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी बिरूदेव बेळुंखी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मृत महिलेवर पती सातत्याने चारित्र्यावरून संशय घेत होता. यावरूनच रविवारी रात्री पती-पत्नीमध्ये जोरदार वाद सुरू होता. या वादातच पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. या दरम्यान आईवडिलांचे भांडण ऐकून मोठी मुलगी मोहिनी ही त्या ठिकाणी आली. तिनेही वडिलांच्या हल्ल्यातून आईला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तिला ढकलून दिले. मात्र, घडलेला प्रकार ती कोणाला तरी सांगेल यामुळे तिचाही गळा आवळून खून करण्यात आला.
हा प्रकार झाल्यानंतर पतीने नामानिराळा राहण्यासाठी पत्नी कोठेतरी गेली आहे, बेपत्ता झाली आहे असे सांगत गावात व नातेवाईकांकडे विचारणा सुरू केली होती. मात्र, पोलीस पाटील तानाजी पाटील यांना संशय आल्याने ही माहिती उमदी पोलिसांना दिली. पोलिसांनी राहत्या घरात जाऊन पाहिले असता दोघींचे मृतदेह आढळून आले.
