स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘हर-घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चीनला व्यवसाय देण्यासाठी ‘हर-घर तिरंगा’ मोहीम सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन केले आहे. खरं तर महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा स्वदेशीचा नारा दिला होता. मात्र, आता स्वदेशीचा नारा कुठं राहिला. आज भारतात जो राष्ट्रध्वज भारतात येतो आहे, तो चीनमधून येतो आहे. चीनला व्यवसाय देण्यासाठी ‘हर-घर तिरंगा’ मोहीम सुरू आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा – मित्रपक्ष संपवण्याच्या शरद पवारांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ”आम्ही शिवसेनेला…”

“राष्ट्रध्वज लावण्याला आमचा विरोध नाही. तो आपला सन्मान आहे. तिरंग्याशी काँग्रेसचे विचार जोडले आहेत. मात्र, याच राष्ट्रध्वजाचा वापर करून केंद्रातील मोदी सरकार इव्हेंट करत आहे. यासाठी लागणारा साहित्य चीनमधून आणल्या जात आहे. आज ‘हर-घर तिरंगा’च्या नावाने आपल्या देशाचा पैसा लुटून चीनला देण्याचा घाट या मोदी सरकारने घातला आहे. याचा विचार देशातील जनतेने करावा”, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Cabinet: बच्चू कडू यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले “नाराजी आहेच, त्यांनी शपथ घेऊन…”

अरुणाचल प्रदेश, लडाखचा काही भाग चीने ताब्यात घेतला आहे. मात्र, केंद्र सरकार त्यावर एकशब्दही बोलत नाही. याचा अर्थ आपला देश चीनकडे गहाण ठेवला जात आहे, अस चित्र निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.