राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खबळबळ उडाली असून, जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. “आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं शरद पवार म्हणालेले आहेत. त्यावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत, अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे. “काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिलेली होती, मात्र जमीन राखणाऱ्यांनीच जमीन चोरली.” असं नाना पटोलेंनी बोलून दाखवलं आहे.

“शरद पवार मोठे आहेत, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही असंच ठरलेलं आहे. परंतु, पक्षाबाबत त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरंतर काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिलेली होती आणि जमीन राखणाऱ्या लोकांनीच जमीन चोरली, डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती आज झालेली असेल, असं त्यांचं मत असेल.” असं नाना पटोलेंनी टीव्ही-9 बरोबर बोलताना म्हटलेलं आहे.

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी – शरद पवार

तसेच, २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात काँग्रेसचाच पंतप्रधान बनेल, हे ठरलेलं आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींचं सरकार हा देश विकायला निघालेलं आहे. यावर सर्वसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे. भाजपाला पर्याय काँग्रेसचं आहे. हे सामान्य जनता ओळखते आहे. त्यामुळे कुणाला काय बोलायचं असेल तर तो लोकाशाहीत त्यांना अधिकार आहे.” असंही यावेळी पटोले म्हणाले आहेत.

प्रशांत किशोरची मला गरज नाही – शरद पवार

विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतात. यावर भाष्य करताना शरद पवार, “काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.” असं देखील म्हणाले होते.